आतापर्यंत 9 जणांचे घेतले बळी ः नेपाळमधील शूटर्सनी झाडल्या चार गोळय़ा
वाल्मिकीनगर / वृत्तसंस्था
बिहारमधील बगहा येथे गेल्या आठ-नऊ महिन्यांत 9 जणांचा बळी घेणाऱया वाघाला शूटर्सनी अखेर ठार केले. गेल्या 26 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. शनिवारी गोवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलुआ गावच्या शेतात त्याला घेराव घातला. शोधकार्यावेळी वाघाची डरकाळी ऐकू आल्यानंतर शूटर्सचा ताफा तीन बाजूंनी शेतवडीत उतरला. यानंतर शूटर्सनी त्याच्यावर 4 गोळय़ा झाडल्या. वाघाच्या पायावर निशाणा साधल्यानंतर तो ऊसाच्या शेतात लपल्याची खात्री तज्ञ पथकाला झाली. यानंतर मैदानाला चारही बाजूंनी जाळय़ांनी वेढले गेले. यानंतर रायफल घेऊन आलेले पथक हत्तीवर स्वार होऊन ऊसाच्या शेतात गेले. तेथे पोहोचताच पथकाची नजर वाघावर पडली आणि त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. दोन गोळय़ा वर्मी लागल्यानंतर वाघाचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या एक महिन्यापासून बगाहामध्ये वाघाने दहशत निर्माण केली होती. माणसांवर हल्ला करणाऱया वाघाला पकडण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी आदेश जारी करण्यात आले होते. 5-6 ऑक्टोबरला वाघाने दोन दिवसांत दोन जणांना ठार केले होते, त्यानंतर 7 ऑक्टोबरला वाघाला ठार मारण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. शनिवारी 7 तासांच्या विशेष मोहिमेनंतर नरभक्षक वाघाची ‘शिकार’ करण्यात आली.
मानवभक्षक वाघाच्या मृत्यूनंतर त्याचे नामोनिशाण पुसले जाते. यासाठी तयार करण्यात आलेल्या एसओपीमध्ये वाघाचे पहिले शवविच्छेदन केले जाते. त्यानंतर पंचनाम्याची कारवाई होते. त्यानुसार शवविच्छेदनासाठी संपूर्ण टीम तयार करण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱयांच्या उपस्थितीत वाघाचे दहन केले जाते. त्याचे सर्व अवशेष नष्ट होईपर्यंत व्हिडीओग्राफीद्वारे नजर ठेवली जाते. वनक्षेत्र संचालक किंवा प्राधिकृत अधिकाऱयाच्या उपस्थितीतच ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाते.
9 महिन्यांत 10 जणांवर हल्ला
मृत वाघाने 9 महिन्यांत 10 जणांवर हल्ला केला होता. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी वाघाने आई आणि मुलावर हल्ला केला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या 3 दिवसात वाघाने 4 जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर तातडीने वाघाला मारण्याचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले होते.