कंग्राळी खुर्द येथील समस्यांसंदर्भात अध्यक्ष व सदस्यांची ता.पं. अधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
रोजगार हमी योजनेतून नागरिकांना काम मिळावे यासाठी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतमधून तालुका पंचायतकडे आराखडा पाठवून देण्यात आला आहे. तो आराखडा तातडीने मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत अध्यक्ष व सदस्यांनी केली आहे. यासाठी केपीसीसीचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनीही अधिकाऱयांना याची दखल घेऊन तातडीने काम करण्यास सांगितले.
बेळगाव तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन हा आराखडा तातडीने मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. रोजगार हमी योजनेतून कंग्राळी खुर्द येथे अनेक कामे रखडली आहेत. अनेक नाले स्वच्छ करण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच गावातील अनेक विकासकामे राबविण्यासाठी सध्या आपण तालुका पंचायतकडे आराखडा तयार करून दिला आहे. या आराखडय़ात सुमारे 3 कोटींची कामे नमूद करण्यात आली आहेत.
जर हा आराखडा तातडीने मंजूर झाला तर गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. याचबरोबर गावातील कामगारांच्या कामाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. तेव्हा हा आराखडा तातडीने मंजूर करून जिल्हा पंचायतीकडे वर्ग करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याचबरोबर जलजीवन मिशनसाठी 2 गुंठे जागा हवी आहे. ही जागा मंजूर करण्यासाठी तालुका पंचायतमधून प्रयत्न होण्याची गरज आहे. तसेच गावात जागा नसून ती जागा एपीएमसीमध्ये दिल्यास सोयीचे ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.
याबाबत बोलताना हे अधिकार आपल्याकडे नसून आमदारांनी यामध्ये लक्ष घातल्यास सोयीचे ठरणार असल्याचे राजेश दनवाडकर यांनी सांगितले. तातडीने दूरध्वनीवरून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी संपर्क साधला व हा प्रकार सांगितला. त्यांनी थेट बेंगळूरशी संपर्क करून ती जागा मंजूर करण्यासाठी लवकरच प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य चेतन कांबळे, वैजू बेन्नाळकर, राकेश धामणेकर, विनायक कम्मार, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.