▪️ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची मुदत वाढविण्यात यावी – सरपंच पराग गांवकर यांची मागणी
In the first phase, 39 entrepreneurs demanded a plot in the Adali industrial area
आडाळी औद्योगिक क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 39 उद्योजकांनी भूखंडाची मागणी नोंदवली आहे.
दरम्यान, अनेक उद्योजकांना भूखंड हवे असल्याने ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी सरपंच पराग गांवकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
कृती समितीच्या वतीने सरपंच श्री. गांवकर, प्रवीण गांवकर व अमोल परब यांनी श्री. राणे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजेंद्र म्हापसेकर,भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगरसेवक संतोष नानचे उपस्थित होते.
श्री. गांवकर यांनी सांगितले की, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड घेण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक होते. त्यामुळेच आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्या माध्यमातून येथील भूखंड खुले करण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार गेल्या 21 तारखेला एकाचवेळी 210 भूखंडांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. अर्ज करण्याची मुदत 4 जानेवारी पर्यंत होती. या दरम्यान शेकडो उद्योजकांनी आडाळीला भेटी देऊन भूखंड घेण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. मात्र अर्ज करण्याची मुदत पंधरा दिवसच असल्याने केवळ 39 उद्योजकच आपली मागणी नोंदवू शकले. सुमारे 50 हून अधिक उद्योजकांनी प्रक्रिया सुरु केली, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नोंदणी पुर्ण होऊ शकली नाही. शिवाय अनेक उद्योजक आजही भूखंड घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ऑनलाईन मागणी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी श्री. राणे व श्री. सामंत यांच्याकडे केली. श्री. राणेंनी तात्काळ प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मुदत वाढविण्याची सूचना केली.
दोडामार्ग – प्रतिनिधी