श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजन, राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई यांची भेट, विविध धार्मिक विधींसह अद्ययावत सोयींनी युक्त खोल्यांचे उद्घाटन
प्रतिनिधी /काणकोण
मागच्या दोन दिवसांत पडत असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱयावर मात करून पर्तगाळी मठाचे 23 वे स्वामी श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या प्रथम पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना शुक्रवारी मोठय़ा दिमाखात सुरुवात झाली. 10 जुलैपर्यंत हे कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहेत. हरी समर्पण या नावाने होणाऱया या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध धार्मिक विधी झाले. नंतर मठ प्राकारात बांधण्यात आलेल्या वातानुकूलित आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असलेल्या खोल्यांचे प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, शिवानंद साळगावकर, दिनेश पै, संजय रायतूरकर, प्रवास नायक, अनिल पै आणि गोव्याच्या विविध भागांबरोबर कर्नाटक, केरळच्या विविध भागांतून आलेले मठाचे अनुयायी उपस्थित होते.
आपल्या नियोजित कार्यक्रमात व्यस्त असताना सुद्धा गोव्याचे राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई यांनी वेळ काढून सपत्नीक भेट देऊन स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले. पर्तगाळी येथील श्री राम मंदिर, महानिर्वाण झालेल्या श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांची समाधी यांचेही राज्यपालांनी दर्शन घेतले. राज्यपाल पिल्लई यांची पर्तगाळी मठाला भेट देण्याची ही चौथी वेळ असून मठ समितीचे अध्यक्ष धेंपे, त्यांच्या पत्नी पल्लवी धेंपे आणि मठ समितीच्या अन्य पदाधिकाऱयांनी राज्यपालांचे उत्स्फूर्त असे स्वागत केले. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसात कुंकळळी, बाळळी हा परिसर पाण्याखाली गेल्यामुळे राज्यपालांना कार्यक्रमस्थळी सुरक्षितरीत्या पोहोण्यासाठी असोळणा ते कुंकळ्ळी असा लांबचा प्रवास करावा लागला. या कार्यक्रमानंतर लगेच राज्यपाल केरळला प्रयाण करणार होते. दुपारी 1 च्या दरम्यान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पर्तगाळी मठाला भेट देऊन स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले.
आगामी पुस्तकात पर्तगाळी मठावर खास प्रकरण : पिल्लई
आपल्याला पर्तगाळी मठाची वास्तू अत्यंत आवडत असून येथील शिस्त, शांतता, सर्वसामान्यांशी असलेली वागणूक आणि नियोजनबद्ध कार्यक्रमांनी आपण भारावून गेलो आहे. गोव्यातील एकंदर परिस्थिती आणि वातावरणावर आपले लवकरच एक पुस्तक येणार असून त्यात पर्तगाळी मठावर एक खास प्रकरण असल्याचे राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी विद्यमान श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आणि युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.
विद्याधिराजतीर्थ स्वामींच्या जीवनावर प्रदर्शन
श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे 1973 ते 2021 पर्यंतच्या त्यांच्या एकंदर कारकिर्दीवर आधारित एक प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे. त्यात स्वामी महाराजांचा पत्रव्यवहार, त्यांचे लेखन, त्यांचा अभ्यास, दैनंदिन जीवनात त्यांनी वापरलेल्या वस्तू, चतुर्मासाच्या वेळी त्यांनी वापरलेली साधने तसेच 48 वर्षांत त्यांनी ज्या ज्या स्थळी भेटी दिल्या व त्यांनी केलेले कार्य यांची छायाचित्रे यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली आणि ते भारावून गेले. यावेळी स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या एकंदर कार्याचे आणि समाजाला त्यांनी जी चालना दिली त्याचे कौतुक केले.
पाच हजार पणत्यांची आरास
या महोत्सवाच्या निमित्ताने श्री वीर विठ्ठल मंदिरासमोर अखंड भजन चालू असून कर्नाटकातील खास भजन पथके यात सहभागी झाली आहेत. त्याशिवाय कार्नाटकातील खास वाद्यवृंद या महोत्सवात सहभागी झाला आहे. तीन दिवस 24 तास अखंड नामस्मरण या ठिकाणी चालू राहणार असून खास उभारलेल्या होमकुंडाजवळ होम-हवन चालू आहे. त्याशिवाय श्री राम मंदिराच्या सभोवती पाच हजार पणत्यांची आरास करण्यात आली आहे. 400 पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी महोत्सवाच्या कामांत स्वतःला झोकून दिले आहे. संपूर्ण कार्यक्रम श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. शुक्रवारी दुपारी 2 वा. पाद्यपूजा झाल्यानंतर संध्याकाळी 4 वा. श्रीदेवी भट शिराली आणि शांतेरी कामथ मंजेश्वर यांचा भजनामृत आणि रात्री 8 वा. रघुनंदन भट, बेंगळुरू आणि अक्षय नाईक, गोवा यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर दीपोत्सव व पुष्पपूजेने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता झाली. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक प्रवीण गावस तसेच अन्य व्यवस्था सांभाळण्यासाठी वाहतूक, वीज, पाणीपुरवठा खात्यांचे अधिकारी, आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
आज मुख्यमंत्री भेट देणार
गुरूवंदना हा या महोत्सवातील मुख्य भाग असून आज सकाळी 8.30 वा. स्वामी विद्याधिराज भवनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी 3 वा. सभा कार्यक्रम होणार असून श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांचे आशीर्वचन यावेळी होणार आहे. त्यापूर्वी दुपारी 12 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मंत्रा उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी आनंद भाटे व राहुल देशपांडे यांची नाटय़संगीत जुगलबंदी हा कार्यक्रम व त्यानंतर विलास नायक, बेंगळुरू यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे.