पशुपालकांना फटका, मकाभरडा, कुळीथ दरात वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने पशुखाद्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विशेषतः मकाभरडा आणि कुळीथच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादन आणि पशुखाद्यांचा दर यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरे आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल आणि शेळय़ा-मेंढय़ांना पशुखाद्यांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे पशुखाद्यांची मागणी अलीकडे वाढली आहे. दुभत्या जनावरांना सकस आहार म्हणून पशुखाद्य दिले जाते. मात्र पशुखाद्यांच्या किमती वाढल्याने दूध उत्पादकांचे अर्थकारण बिघडले आहे. पशुखाद्यांच्या किमतीमध्ये क्विंटल मागे शंभर रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना फटका बसत आहे.
जनावरांना पोषक आहार म्हणून भुसा, कांडीपेंड, सरकीपेंड, मकाभरडा, हरभराचुनी आदी खाद्य वापरले जाते. या खाद्यांच्या किंमती वाढल्या आहेत. भुसा 50 किलो 1000 ते 1150 रु., कांडीपेंड 700 ते 1300 रु., सरकीपेंड 45 किलो 1300 रु., मकाभरडा 1350 रु., तुरचुनी 50 किलो 1000 रुपये, हरभराचुनी 50 किलो 1100 रुपये, कुळीथ 100 किलो 5500 रुपये असा दर आहे. गोकुळ संघाने आपल्या पशुखाद्यांच्या किमतीत अलीकडेच वाढ केली आहे. त्यापाठोपाठ बाजारातही पशुखाद्यांच्या किमती वाढल्याने उत्पादनाचा ताळमेळ बसणे अवघड बनले आहे.