रोहित शर्माच्या संघाला आयसीसी जेतेपदाचा दशकभराचा दुष्काळ संपविण्याची संधी
वृत्तसंस्था/ लंडन
जागतिक कसोटी स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भारताचा अंतिम सामना आज बुधवारपासून सुरू होणार असून जागतिक जेतेपद पटकावण्याच्या बाबतीत एक दशकभरापासून भेडसावणारा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानावर उतरले. मात्र त्यासाठी बलाढ्या ऑस्ट्रेलियाशी भिडताना भारतीय क्रिकेटपटूंना कौशल्य आणि संयम यांचे परिपूर्ण मिश्रण करावे लागेल.
दोन जागतिक कसोटी स्पर्धांचा विचार करता भारत हा सर्वांत सातत्यपूर्ण संघ राहिलेला आहे आणि गेल्या 10 वर्षांत मर्यादित षटकांच्या मोठ्या स्पर्धांत भारत बाद फेरीतही पोहोचलेला आहे, परंतु चषक मात्र त्यांच्यापासून दूरच राहिलेला आहे. भारताने शेवटचे मोठे जेतेपद हे 2013 मध्ये पटकावले होते. त्यावेळी त्यांनी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून संघाला तीन वेळा अंतिम फेरीत आणि चार वेळा उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागलेला आहे. 2021 च्या ‘टी20’ विश्वचषक स्पर्धेत तर ते प्राथमिक टप्प्यातच बाहेर पडले.
या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतर्गत खेळलेल्या सहा मालिकांपैकी दक्षिण आफ्रिकेतील एकमेव मालिकेत भारताचा पराभव झाला आणि त्यामुळे नेतृत्वात अनपेक्षित बदल होऊन रोहित शर्माने विराट कोहलीकडून सूत्रे हाती घेतली. ते मायदेशी अजिंक्य राहिले, तर इंग्लंडमध्ये चुरसपूर्ण ठरलेली मालिका त्यांनी अनिर्णित राखली. बांगलादेशात धोका निर्माण झाला होता, पण त्यातून बाहेर सरण्यात ते यशस्वी ठरले. मोठ्या स्पर्धांची जेतेपदे संघाचा वारसा निश्चित करतात. परंतु ओव्हलवरील अंतिम सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे त्यांच्या संघाबद्दलचे मत बदलणार नाही, असे दिसून येते.
‘तुम्ही याकडे पहा. हा दोन वर्षांच्या परिश्रमांचा कळस आहे. अनेक यशांची नोंद केल्यानंतर तुम्ही येथे पोहोचता’, असे द्रविडने या लढतीपूर्वी बोलताना सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने मालिका जिंकली, इंग्लंम्डमध्ये मालिका अनिर्णित राखली. गेल्या पाच-सहा वर्षांत हा संघ जगात जेथे जेथे खेळलेला आहे तेथे तेथे अतिशय स्पर्धात्मक राहिलेला आहे. मला वाटते की, आयसीसी चषक पदरी असला वा नसला म्हणून त्या गोष्टी कधीही बदलणार नाहीत’, असे त्याने सांगितले.
भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची गरज
साउथॅम्प्टन येथे दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारताने परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या पारंपरिक ताकदीसह म्हणजे दोन फिरकीपटूंसह खेळणे पसंत केले. परंतु हे पाऊल अंगलट आले. ओव्हलच्या 143 वर्षांच्या इतिहासात प्रथमच जूनमध्ये कसोटीचे आयोजन केले जात असून त्यामुळे परिस्थिती कशी असेल हे सांगणे कठीण बनलेले आहे. अशा परिस्थितीत संघ निवड या सामन्याचे भवितव्य ठरविण्याच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन या दोघांनाही खेळवण्याचा मोह होऊ शकतो. पण ही उन्हाळ्याची सुऊवात आहे आणि खेळपट्टी ताजी आहे हे लक्षात घेता चौथा वेगवान गोलंदाज खेळविण्याचा पर्याय जास्त उपयुक्त वाटतो. फलंदाजीच्या विभागात वरची फळी कोसळल्यास संघाला सावरण्यासाठी यावेळी ऋषभ पंत उपलब्ध नाही. त्यामुळे व्यवस्थापनाला इशान किशनच्या ‘एक्स-फॅक्टर’चा आधार घ्यायचा की, के. एस. भरतच्या अधिक विश्वासार्ह यष्टीरक्षण कौशल्यावर विसंबून राहायचे हे ठरवावे लागेल. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजीची धुरा वाहतील हे निश्चित असून अनुभवी उमेश यादव आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल.
‘आयपीएल’मधून थेट कसोटीत
भारतीय संघातील बहुतेक खेळाडू हे दोन महिने चाललेल्या ‘आयपीएल’मध्ये खेळलेले आहेत आणि लंडनला रवाना होण्यापूर्वी अऊंडेल या निसर्गरम्य शहरात एकत्र सराव करण्यासाठी त्यांना फक्त एक आठवडा मिळाला आहे. आधुनिक काळातील क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात सहज स्थित्यंतर करणे अपेक्षित असले, तरी इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणे कधीही सोपे नसते. जेव्हा पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांना सामोरे जावे लागते तेव्हा तर हे आव्हान अधिकच कठीण होते. ऑस्ट्रेलियाकडून दुखापतग्रस्त जोश हेझलवूडच्या जागी बोलँडला संधी देण्यात आली आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या सामन्याचे ‘अंतिम कसोटी’ असे वर्णन केले जात असून रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूंसाठी तसेच शुभमन गिलसारख्या उगवत्या स्टारसाठीही तो खरोखरच तसा असेल. चेतेश्वर पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये दाखवलेला फॉर्म कसोटीतही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर अजिंक्य रहाणे त्याच्या पुनरागमनाच्या सामन्यात ठसा उमटविण्यास उत्सुक असेल.
ऑस्ट्रेलियासाठी हा अॅशेसपूर्वीचा उच्च दर्जाचा ’वार्म अप’ असेल. भारतीय खेळाडू आयपीएलचा प्रदीर्घ मोसम खेळलेले असल्याने ‘मॅच-फिट’ आहेत, तर ऑस्ट्रेलियन तन-मनाने ताजेतवाने आहेत. त्यांचे फक्त तीन खेळाडू आयपीएलचा भाग होते. कमिन्ससारख्या खेळाडूने मायदेशी तयारी करणे पसंत केले, तर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी काउंटीमध्ये खेळून दीर्घ मोसमासाठी स्वत:ला तयार केले. दर्जेदार वेगवान गोलंदाजीविरुद्ध कोणत्याही संघाची वरची फळी कशी कामगिरी करते यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजा चमकेल अशी संघाला अपेक्षा असेल, तर डेव्हिड वॉर्नरसाठी त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात स्वत:ला सिद्ध करण्याची ही एक संधी आहे. या मैदानावर स्मिथची सरासरी 100 च्या जवळपास आहे आणि भारताला त्याचा अडथळा लवकर दूर करावा लागेल. ओव्हलची खेळपट्टी कशीही असली, तरी अनुभवी ऑफ-स्पिनर नॅथन लियॉन आपल्या परीने प्रयत्न करेल आणि अष्टपैलू या नात्याने कॅमेरून ग्रीनचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरेल.
संघ : ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स र्पे, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, जोश इंग्लिस, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर. राखीव खेळाडू : मिच मार्श, मॅट रेनशॉ.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, के. एस. भरत, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, विराट कोहली, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, उमेश यादव. राखीव : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
सामन्याची वेळ : दुपारी 3 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क