वृत्तसंस्था/ लॉडेरहिल
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने रविवारी यजमान विंडीजचा शेवटच्या टी-20 सामन्यात 88 धावांनी दणदणीत पराभव करत 5 सामन्यांची ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. भारतीय संघाने शेवटच्या विजयाने आपल्या विंडीज दौऱयाला निरोप दिला. शेवटच्या सामन्यात श्रेयस अय्यरचे दमदार अर्धशतक तसेच भारताच्या फिरकी गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरली.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 188 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा डाव 15.4 षटकात 100 धावात आटोपला.
भारताच्या डावामध्ये सलामीच्या श्रेयस अय्यरने 40 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 64 धावा जमविताना हुडा समवेत दुसऱया गडय़ासाठी 76 धावांची भागिदारी केली. हुडाने 25 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 38 धावा जमविल्या. ईशान किसनने 1 चौकारासह 11, सॅमसनने 2 चौकारांसह 15, हार्दिक पांडय़ाने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 28, दिनेश कार्तिकने 2 चौकारांसह 12, अक्षर पटेलने 1 षटकारासह 9 धावा जमविल्या. भारताच्या डावात 7 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे ओडेन स्मिथने 33 धावात 3 तर होल्डर, ड्रेक्स, वॉल्श यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या जादुमय फिरकीसमोर विंडीजचा डाव 15.4 षटकात 100 धावात आटोपला. विंडीजतर्फे हेटमेअरने एकाकी लढत देत 35 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 56, ब्रुक्सने 2 चौकारांसह 13, आणि थॉमसने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. विंडीजच्या 4 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. भारतातर्फे रवी बिस्नॉयने 16 धावात 4, कुलदिप यादवने 12 धावात 3 तर अक्षर पटेलने 15 धावात 3 गडी बाद केले. या सामन्यात राहित शर्माने विश्रांती घेतल्याने हार्दिक पांडय़ाकडे नेतृत्व सोपविण्यात आले होते.
संक्षिप्त धावफलक
भारत – 20 षटकात 7 बाद 188 (श्रेयस अय्यर 64, हुडा 38, सॅमसन 15, हार्दिक पांडय़ा 28, दिनेश कार्तिक 12, ईशान किसन 11, अक्षर पटेल 9, ओडेन स्मिथ 3-33, होल्डर, ड्रेक्स, वॉल्श प्रत्येकी 1 बळी), विंडीज – 15.4 षटकात सर्वबाद 100 (हेटमेअर 56, ब्रुक्स 13, थॉमस 10, बिस्नॉय 4-16, कुलदिप यादव 3-12, अक्षर पटेल 3-15).