वृत्तसंस्था/ चेन्नई
शनिवारी येथील मेयर राधाकृष्णन स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात दोन गोलांनी पिछाडीवर असलेल्या यजमान भारताने मलेशियाचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव करून चौथ्यांदा आशिया चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. सामन्याच्या पूर्वार्धात भारताच्या तुलनेत मलेशियाचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान झाल्याने भारतावर दडपण आले होते. सामन्यातील 9 व्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर जुगराज सिंगने भारताचे खाते उघडले. यानंतर दुसऱ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत मलेशियाच्या खेळाडूंनी भारतीय बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. 14 व्या मिनिटाला अबु कमाल अझारीने उजव्या बगलेतून मिळालेल्या पासवर भारताशी बरोबरी साधली. सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांचा कालावधी संपण्यास केवळ काही सेकंद बाकी असताना भारताला पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते वाया गेले.
सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत 18 व्या मिनिटाला मलेशियाला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले त्यापेकी दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर रेझी रहीमने मलेशियाचा दुसरा गोल केला. 28 व्या मिनिटाला मलेशियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या मोहमद अमिनुद्दीनने या संधीचा पुरपूर फायदा घेत मलेशियाचा तिसरा गोल केला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत मलेशियाने भारतावर 3-1 अशी आघाडी घेतली होती. 43 व्या मिनिटाला मलेशियाला तिसरा गोल पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारतीय गोलरक्षकाने तो थोपवला. या कालावधीनंतर दोन मिनिटांच्या अंतराने भारताने अप्रतिम दोन गोल करून मलेशियाशी 3-3 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. 45 व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रित सिंगने पेनल्टी कॉर्नर भारताचा दुसरा तर गुरुजंत सिंगने भारताचा तिसरा गोल मैदानी गोल नोंदवला. सामना संपण्यास सहा मिनिटे बाकी असताना भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण हरमनप्रितचा फटका मलेशियाच्या गोलरक्षकाने थोपवला. यानंतर काही सेकंदातच भारतीय आघाडी खेळीतील खेळाडूंनी मलेशियाच्या बचावफळीवर दडपण आणण्यात यश मिळवले. सामना संपण्यास केवळ दोन मिनिटे बाकी असताना आकाशदीप सिंगने भारताचा चौथा आणि निर्णायक गोल करून मलेशियाचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले.