मुंबई :
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. त्यासंदर्भातील घोषणा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी करून #OperationAjay लाँच केल्याची माहीती दिली. परदेशात भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या योजनेवर भर देताना नागरिकांच्या परतीसाठी विशेष चार्टर विमाने आणि आवश्यक व्यवस्था आयोजित केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. या संघर्षात अनेक परदेशी नागरिक अडकले आहेत. त्या नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांचा आणि विद्यर्थ्यांचाही समावेश आहे. तसेच पर्यटक आणि नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या लोकांनाही या युद्धामुळे प्रचंड झळ बसली आहे.
आज परराष्ट्रमंत्री एस. जय़शंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहीती दिली. त्यानुसार इस्त्रायल आणि हमास यांच्या संघर्षात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाने नोंदणीकृत भारतीय नागरिकांच्या पहिल्या बॅचला आगामी विशेष फ्लाइटबद्दल ईमेल करून त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे.
इस्रायलचे मध्यपश्चिम भारतातील दूत कोबी शोशानी यांनी ‘ऑपरेशन अजय’ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. या ऑपरेशनचे उद्दिष्ट इस्रायलमध्ये अडकलेल्या अंदाजे 18, 000 भारतीय नागरिकांना परत आणण्याचे असून त्यात बहूसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शोशानी यांनी इस्रायलच्या अर्थव्यवस्थेत भारतीय व्यापारी समुदायाचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले आणि समुदायाबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले.