वृत्तसंस्था/ बेंगळूर
टीम इंडियाने आशिया चषकाच्या मोहिमेसाठी कर्नाटकातील बेंगळूरच्या बाह्यवर्ती भागात अलूर येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात जोरदार तयारी केलेली आहे. आशिया चषक स्पर्धेला आज 30 ऑगस्टपासून सुऊवात होत असून त्यात पाकिस्तानचा मुकाबला नेपाळशी पाकिस्तानातील मुलतान येथे होणार आहे. श्रीलंकेतील कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविऊद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय खेळाडू या स्पर्धेसाठी कठोर सराव करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा तसेच इतर फलंदाज जाळ्यामध्ये घाम गाळताना दिसतात. तर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि इतर गोलंदाज श्रीलंकेतील खेळपट्ट्यांचा विचार करून अचूक मारा करण्याचा सराव करताना दिसले आहेत.
आशिया चषकात पाकिस्तान, भारत आणि नेपाळ हे गट ‘अ’मध्ये आहेत, तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे गट ‘ब’मध्ये आहेत. ही स्पर्धा एका संकरित मॉडेलनुसार होणार असून त्यामध्ये पाकिस्तान दोन ठिकाणी चार सामने आयोजित करेल आणि उर्वरित सामन्यांचे आयोजन श्रीलंका करेल. सहा गटस्तरीय सामन्यांनंतर 6 सप्टेंबरपासून ‘सुपर फोर’ फेरी सुरू होईल. 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.