वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी 2030-31 या आर्थिक वर्षात म्हणजेच येत्या 8 वर्षांत 4 दशलक्ष कारची उत्पादन क्षमता गाठण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी कंपनी सध्याच्या 45,000 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा वापर करणार असल्याचीही माहिती आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी ही माहिती दिली. कंपनीने तिचा तिसरा विस्तार टप्पा सुरू करून, पुढील 8 वर्षांत 2 दशलक्ष अतिरिक्त कारची उत्पादन क्षमता जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भार्गव म्हणाले की, या कालावधीत कंपनीला दुप्पट महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. झपाट्याने वाढीसाठी कंपनीची पुनर्रचना होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मारुतीच्या सुझुकी कॉर्पोरेशनच्या गुजरात प्रकल्पाच्या अधिग्रहणावर भार्गव म्हणाले की मारुतीच्या वाढीच्या टप्प्याकरीता ज्याला ‘मारुती 3.0’ असे नाव देण्यात आले आहे, त्यात इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), सीएनजी, इथेनॉल आणि सीबीजी सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये मजबूत गुंतवणूक करण्याची योजना कंपनीची असेल.
उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर
कंपनीच्या नवीन प्लान ‘मारुती 3.0’ बद्दल बोलताना मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर. सी. भार्गव म्हणाले की, या अंतर्गत कंपनी पुढील नऊ वर्षांमध्ये दरवर्षी 2 दशलक्ष युनिट्सने उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. या अंतर्गत, आर्थिक वर्ष 2031 च्या अखेरीस, कंपनी सुमारे 28 विविध मॉडेल्स बाजारात उतरवणार आहे. कंपनी सध्या एसयूव्हीची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील मारुतीचा हिस्सा 41.3 टक्के होता.