दुसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशवर 8 धावांनी विजय : दीप्ती-शेफालीचे प्रत्येकी तीन बळी
वृत्तसंस्था/ चिटृग्राम (बांगलादेश)
येथील शेर-ए-बांगलादेश स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेशचा अवघ्या 8 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 8 बाद 95 धावांपर्यंत मजल मारली होती. हा सामना बांगलादेश महिला संघ जिंकणार असे वाटत होते पण दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचा संघ 87 धावांत गारद झाला. 12 धावांत 3 बळी मिळवणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 13 रोजी मिरपूर येथे होईल.
पहिल्या सामन्यात धमाकेदार विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावत 95 धावा केल्या. स्मृती मानधना (13) व शेफाली वर्मा (19) या सलामीच्या जोडीला फारशी चमक दाखवता आली नाही. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरलाही भोपळाही फोडता आला नाही. यावेळी भारताची 3 बाद 33 अशी बिकट स्थिती झाली होती. जेमिमा रॉड्रिग्ज (8), यास्तिका भाटिया (11), हरलीन देओल (6), दीप्ती शर्मा (10), अमनजोत कौर (14) धावा करत भारताला नव्वदीचा टप्पा गाठून दिला. बांगलादेशकडून सुलताना खातूनने सर्वाधिक 3 तर फहिमा खातूनने 2 गडी बाद केले. मारुफा अख्तर, नाहिदा अख्तर आणि राबेया खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना साथ दिली.
दीप्ती-शेफालीचे प्रत्येकी तीन बळी
भारताने दिलेल्या 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुलताना अवघ्या पाच धावा काढून तंबूत परतली. तर शाती राणीलाही (5) फारशी चमक दाखवता आली नाही. यानंतर मुर्शिदा खातूनही स्वस्तात बाद झाली. तिने 4 धावा केल्या. रितु मोनीने 6 चेंडूत 4 धावा केल्या. शोरना अख्तर हिने 17 चेंडूत सात धावा केल्या. कर्णधार निगर सुलतानाने एकाकी झुंज देताना सर्वाधिक 38 धावांची खेळी साकारली. दिप्ती शर्माने सुलतानाला बाद केले. रबाया खान, फहिमा खातून आणि मारूफा अख्तर यांना भोपळाही फोडता आला नाही. विशेष म्हणजे, बांगलादेशची कर्णधार सुलताना वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. यामुळे त्यांचा डाव 20 षटकांत 87 धावांवर आटोपला. भारताकडून दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी भेदक मारा केला. दिप्तीने 12 धावांच्या मोबदल्यात तीन तर शेफालीने 15 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या. मिन्नू मणीने 9 धावा देत दोन विकेट घेतल्या.