ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली. गेल्या सहा महिन्यात ब्रिटनमध्ये अशा काही घटना घडल्या की तेथील जनतेला काय होतेय हे कळायच्या आत बाजी भारतीय वंशाच्या राजकीय नेत्यांच्या हातात गेली. अर्थात लिज ट्रस यांनी डाव साधलाच होता, पण बुद्धिहीन राजकारण्याचा निभाव लागणे कठिण असल्याने अवघ्या पंचेचाळीस दिवसात राजीनामा देण्याची नामुष्की ओढवून घेतली.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर ऋषी सुनकची वर्णी लागणार असल्याची कुणकुण लागताच, लिज ट्रस या गौरवर्णिय संसद सदस्याला पक्षांतर्गत निवड चांचणीसाठी उभे केले. ब्रिटनच्या भवितव्यासाठी उपयुक्त धोरणांचा पुरस्कार करत सुनक सुरुवातीच्या काळात पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आघाडीवर होते. पण वंशवाद उफाळून आला अन् श्रीमती लिज ट्रस हिने शेवटच्या क्षणी बाजी मारली. मात्र तिने राजिनामा दिल्यानंतर ऋषी सुनक यांनी बुद्धिचातुर्याने आणि प्रचंड राजकीय डावपेच वापरून बोरिस जॉन्सनच्या सहकार्याने ब्रिटनचे सर्वोच्च पद पटकाविले. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात अर्थमंत्र्यांची धूरा सुनक यांनी सांभाळली होती.
ब्रिटनची अर्थव्यवस्था सध्या नाजुक स्थितीत पोहोचली आहे. महागाईने उच्चांक गाठल्याने तेथील जनता हवालदिल झालेली आहे. अर्थात जगभरात महागाईने थैमान घातले आहे. अमेरिका व अन्य काही देशांच्या तिजोरीत बक्कळ पुंजी असल्याने मोजक्या देशांनी महागाई थोपवून धरलेली आहे. मात्र त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. अशा या स्थितीत ब्रिटनची परिस्थिती बरीच बिकट झालेली आहे. त्यातून बाहेर काढणे गरजेचे असून सुनकसारखे अर्थतज्ञ त्यातून मार्ग काढू शकतात असा आशावाद निर्माण झाल्यानेच अखेर सत्तारुढ टोरी पक्षातील बहुतांश संसद सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर एकेकाळी गुलाम असलेल्या देशातील वंशज विराजमान झाल्याने ब्रिटनचे दुसऱया महायुद्ध काळातील माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या मानसिकतेत वाढलेल्या ब्रिटिश नागरिकांत बरीच जळफळ सुरु झालेली आहे. तर भारतात अशा पिल्लावळीला चपराक बसल्याचा आनंद दिसून येतो. दुसऱया महायुद्धाच्या काळात जर्मन आणि जपानला नमवून हिरो बनलेल्या तत्कालीन
पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी भारतीय हिंदूंची तुलना गांडुळांबरोबर केली होती. त्याच्या पिल्लावळीने भारत म्हणजे साप विंचवांचा देश म्हणून अवहेलना केली होती. तशीच मानसिकता आजही पुराणमतवादी ब्रिटिश जनतेत रुजलेली आहे. त्यांच्या या विचारसरणीला ऋषी सुनक यांच्या नेतृत्वामुळे जबरदस्त चपराक बसलेली आहे. ब्रिटीश साम्राज्यामुळेच भारतात सुराज्य आले, रेल्वे अवतरली म्हणणाऱया ब्रिटीश समर्थकांना पंधराव्या शतकापर्यंत भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पहिल्या पाच क्रमांकात कशी काय होती याचे उत्तर देता येत नाही. त्या काळात ब्रिटनचे साम्राज्य पहिल्या दहा क्रमवारीत कधी झळकलेच नाही.
पंधराव्या शतकापूर्वीची स्थिती पुन्हा एकदा अवतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्याच महिन्यात भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. तर पाचव्या स्थानावर असलेले ब्रिटन सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. ब्रेक्झिटमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था भविष्यात पंधराव्या स्थानावर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. युरोपियन युनियनपासून फारकत घेतल्यापासून
ब्रिटनची दयनीय अवस्था झालेली आहे. विन्स्टन चर्चिल आणि त्याची पिल्लावळ भारताच्या अधोगतीला विकासाचा मुलामा देऊन भारतातील रेल्वेसेवा म्हणजे वरदान असल्याचे भासवत असले तरी ती भारतातील कोळसा चोरून ब्रिटिश साम्राज्यातील दिवे पेटविण्यासाठी वापरली जात होती. सोळाव्या शतकानंतर ब्रिटिश आणि युरोपियनांचे पांढरे पाय भारत भूमीला लागल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था जोमाने तळाला गेली. आज स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे सारत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथा पालथ झाल्यानंतर ब्रिटनची सत्तासुत्रे एका भारतीय वंशाच्या हिंदू नेत्याच्या हातात आलेली आहे.
ब्रिटनची गेल्या महिन्यात झालेली अधोगती आणि एका मुळ भारतीय वंशाच्या हातात त्या देशाची सत्तासुत्रे म्हणजे काळाचा महिमाच म्हणावा लागेल. भारतीय आणि त्यातही हिंदू हे बिनकामी म्हणून होणारी हेटाळणी आतातरी थांबेल काय? ऋषी सुनक यांनी पदभार सांभाळल्यानंतर ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी भारत, भारतीय नेते आणि हिंदूबद्दल केलेली टीकाटिपणी बरीच चर्चेत आलेली आहे. भारतातील नामवंत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती होताच ट्विटरच्या माध्यमातून तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांच्या भारतीय नेत्यांबद्दल काढलेल्या अवमानकारक भाषेची खिल्ली उडविली आहे.
स्वतंत्र भारतात अराजकतेचा आगडोंब उसळणार आणि त्याची न मोजता येण्याजोगी शकले उडणार. तसेच अर्थव्यवस्थेचा पार भोपळा होऊन या देशात पाणी आणि प्राणवायूवरही कर लादला जाईल, असे भाकीत चर्चिल यांनी केले होते. चर्चिलचे हे भाकीत प्रत्यक्षात उतरावे यासाठी ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिमांच्या दंगली पेटवून दिल्या. भारताची फाळणी केली.
चर्चिलला हवा असलेला भारत सुरुवातीच्या पन्नास वर्षांत मार्गक्रमण करत होताच. पण गेल्या पंचवीस वर्षांत अचानकपणे हवा पालटली. 1999 साली पोखरणमध्ये अणुबॉम्बचे स्फोट झाले, अन् भारतावर जगभरातील देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधानंतर भारत स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करू लागला. कारगिलच्या युद्धात एकाकी पडलेला भारत तावून सुलाखून आत्मनिर्भरतेच्या दिशेने कुच करू लागला. जागतिक नेत्याच्या श्रेणीत असलेल्या विन्स्टन चर्चिलचे भाकीत काळाने उलटे फिरविले.
प्रशांत कामत