विश्वचषक तिरंदाजी : फ्रान्स संघावर मात, पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव
वृत्तसंस्था /ग्वांगजू, द.कोरिया
येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्टेज 2 तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला रिकर्व्ह संघाने कांस्यपदक पटकावले. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे पदक आहे.
गुरुवारी भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाला उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या. मात्र महिला संघातील रिद्धी फोर, कोमलिका बारी, अंकिता भगत या युवा तिरंदाजांनी चिनी तैपेई संघाचा 6-2 (56-52, 54-51, 54-55, 55-54) असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. भारतीय त्रिकुटाने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करीत पहिल्या बारा ऍरोजमध्ये तीनदा पूर्ण 10, आठवेळा 9 गुण मिळवित 4-0 अशी आघाडी घेतली. तिसऱया सेटमध्ये रेड सर्कलच्या आत (8-8) तीर मारल्याने हा सेट भारताला गमवावा लागला. पण चौथ्या सेटमध्ये पुन्हा मुसंडी मारत एकदा 10 व पाचवेळा 9 गुण घेत सेटसह पदकही मिळविले.
त्याआधी उपांत्य फेरीत भारतीय संघाला यजमान दक्षिण कोरियाकडून 2-6 (53-55, 57-55, 51-53, 43-53) असा पराभव स्वीकारावा लागला होता. कोरियन संघाचा खेळ उत्तम झाला असे नव्हे. पण भारतीय खेळाडू दडपणाला बळी पडल्या. त्यांच्या खेळात सातत्य नव्हते. पण फक्त दुसऱया सेटमध्ये त्यांनी चांगले प्रदर्शन केले. या सेटमध्ये त्यांनी 4 वेळा 10, एकदा 9 गुण मिळविले. चौथ्या सेटमध्ये भारतीयांचा एक वेध चुकला तर आणखी एकदा रेड रिंगमध्ये (7) तीर मारल्याने फाईट देण्याची संधीही हुकली. कोरियानेही फक्त 53 गुण नोंदवले होते.
पुरुषांच्या रिकर्व्ह संघाला 15 व्या मानांकित फ्रान्सकडून 2-6 (54-57, 55-52, 53-55, 47-53) असा पराभव पत्करावा लागला. सातवे मानांकन असलेल्या भारतीय संघात तरुणदीप राय, जयंत तालुकदार, नीरज चौहान यांचा समावेश आहे. भारताने पहिल्या सेटमध्ये दोनदा आठ गुण नोंदवले तर दुसरा सेट जिंकल्यानंतर तिसऱया व चौथ्या सेटमध्ये त्यांची पुन्हा घसरण झाली. चौथ्या सेटमध्ये दोनदा रेड रिंग (8-7) व एकदा ब्ल्यू रिंगमध्ये (6) वेध घेतला. बुधवारी भारताच्या पुरुष कंपाऊंड संघाने अंतिम फेरी गाठत किमान रौप्य निश्चित केले तर महिला संघाने कांस्यपदक पटकावले.