‘होईल तो भाव’ याप्रमाणे भात उधारी घेऊन गेलेल्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले : न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनांनी पुढाकार घ्यावा
अरुण टुमरी /काकती
गेल्या महिनाभरात इंद्रायणी भाताची बाजारात आवक घटल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला आहे. परिणामी इंद्रायणी भाताचे भाव भडकून प्रति क्विंटल 2800 रुपये भाव स्थिर झाला आहे. अद्याप भात साठवूण ठेवलेल्या शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. गेल्या 25 वर्षात एकदमच एवढा अधिक भाताचा भाव वाढल्याने ‘होईल तो भाव’ याप्रमाणे भात उधारी घेऊन गेलेल्या भात व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शेतकरी बांधव वाढलेल्या भावाप्रमाणे मागणी करीत असल्याने व्यापारी वाद-विवाद करीत आहे. याकरिता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यात यंदा भाताचे पीक अनुक्रमे 28856 व 30042 हेक्टरात घेण्यात आले होते. यापैकी 75 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे पीक घेण्यात आले होते. यापैकी सुगी हंगामात 85 टक्के भात खळ्यावर विक्री केले असून, 85 टक्क्यांपैकी 65 टक्के शेतकऱ्यांनी 2000 ते 2100 रुपयांपर्यंत रोख विक्री केली आहे. यापैकी 20 टक्के शेतकऱ्यांनी होईल त्या दराने मागेल त्या महिन्यात या कराराने उधारी दिले आहे. आता शेतकरी 2800 रुपये प्रमाणे वाढलेल्या भावात व्यापाऱ्यांकडून मागणी करीत आहेत. काही व्यापारी वाढीव भाव देत आहेत. एकदमच भाव वाढले आहेत आम्ही तुमचे भात सुगीतच विकले आहे, असे सांगून कमी भावात आपले भात गोळा करणाऱ्या एजंटाकरवी देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यापूर्वी गेली अनेक वर्षे भात सुगी हंगामापेक्षाही रुपये 100 रुपयानी भाव कमी होत असत. तेव्हा निमूटपणे शेतकरी पैसे घेत होता.
सरकारी हमीभाव न परवडणारा
गेल्या 25 वर्षात केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या कमिशन फॉर अॅग्रीकल्चर क्रॉप अॅण्ड प्रायसेसकडून ठरविण्यात येणारा हमीभाव उत्पादन खर्चावर अधारित नव्हता. यामुळे भातशेती परवडत नसल्याने शेतकऱ्याला दारिद्र्यात जीवन घालवावे लागत होते. यंदा 2022-23 सालाकरिता ‘ए’ ग्रेडच्या भाताचा भाव केवळ रुपये 2060 होता. याकरिता उडपी, दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड जिल्ह्यात तेथील स्थानिक आमदारांनी राज्य सरकारकडे आवाज उठवून प्रति क्विंटल रुपये 500 ची वाढ घेतली असल्याने सरकारी भात खरेदी केंद्रातून प्रति क्विंटल 2560 याप्रमाणे सुगी हंगामात शेतकऱ्यांना भाव मिळाला होता. मात्र बेळगाव, खानापूर येथील आमदारांनी बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात देखील शेतकऱ्यांना वाढीव भाव भाताला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घरी बसून राहण्याची वाट दाखविणे गरजेचे झाले आहे.
शेतकरी संघटनांनी आवाज उठविणे गरजेच
भविष्यात शेतकऱ्यांच्या भाताला बाजारात भाव रास्त मिळू शकतो, अशी शेतकरी वर्गातून भावना व्यक्त होत आहे. मात्र कल्याणकारी योजनाचे आमिष दाखवून प्रति माणशी 10 किलो तांदूळ बीपीएल कार्डधारकांना देण्याऐवजी त्यांना तेवढी रक्कम पैशाच्या रुपात द्यावी. यामुळे भाताचे भाव घसरणार नाहीत. अन्यथा शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. या विरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठविणे गरजेचे आहे.
व्यापाऱ्यांवर गंभीर पाऊल उचलावे
सुगी हंगामात होईल त्या दराने उधारी घेऊन गेलेल्या व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल 2800 रुपये भाव देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शेतकरी संघटनांनी गंभीर पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.
तर व्यापारी विरोधात आंदोलन छेडणार- धर्मराज गौडर
शेतकऱ्यांना इंद्रायणी भाताचा भाव 2800 रुपये मिळत असून, यंदा शेतकऱ्यांच्या श्रमाला फळ मिळत आहे. ही बाब समाधानकारक आहे. असे नेगलयोगी सुरक्षा रयत संघ राज्याध्यक्ष धर्मराज गौडर म्हणाले. होईल त्या भावाने व्यापाऱ्यांनी सुगी हंगामात इंद्रायणी भाताची खळ्यावरुन उचल केली आहे. त्या शेतकरी बांधवांना वाढलेला भाव द्यावा. यात कोणतीही चूक केल्यास संबंधित व्यापारी विरोधात आंदोलन छेडण्यास मागे-पुढे पाहणार नाही.