वार्ताहर / राजापूर
राजापूर कोदवली पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले पत्रकार शशिकांत शंकर वारीशे यांचे मंगळवारी पहाटे कोल्हापुरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. या प्रकरणी महिंद्रा थार गाडीचालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
तालुक्यातील कशेळी येथील रहिवासी शशिकांत वारीशे हे सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास राजापूर पेट्रोल पंपातून आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून बाहेर पडत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱया महिंद्रा थार या गाडीने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली होती. यात शशिकांत वारीशे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरूवातीला राजापूर ग्रामीण रूग्णालय नंतर रत्नागिरी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने सोमवारी रात्री 8 च्या सुमारास पुढील उपचारासाठी कोल्हापुरातीलच सिटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातप्रकरणी वारीशे यांच्या मेहुण्यांनी दिलेल्या तक्रारीवरून, राजापूर पोलिसांनी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मंगळवारी दुपारी अटक केली. त्याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 308, 304 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती परबकर यांनी दिली.
दरम्यान मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिले. या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचेही पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी सांगितले.