पादचारी, वाहन चालकांना त्रास
प्रतिनिधी /म्हापसा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर म्हापशातील पेडे येथील जंक्शन पादचाऱयांसह वाहन चालकांच्या दृष्टीने जीवघेणे तथा त्रासदायक बनलेले आहे. काही मूलभूत सुविधांचे निर्माण त्या ठिकाणी करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने या अपघातप्रवण क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. हल्लीच्या काळात तिथे कित्येक अपघात झालेले आहेत.
गेल्या चार दिवसांत त्या ठिकाणी तीन चार वाहन अपघात घडलेले आहेत. त्या भागात गतिरोधक अथवा सूचना फलकांची पुरेशी सोय केली नसल्याने भरधाव गतीने येणाऱया वाहनांमुळे अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग गेल्या सुमारे चार महिन्यांपासून खुला केल्यापासून तेथील वाहतूक वाढलेली आहे व त्यामुळेच तिथे कित्येक अपघात होत आहेत. त्या ठिकाणी सध्या दरदिवशी किमान एक लहान मोठा अपघात होत आहे ही वस्तुस्थिती आहे.
म्हापशातील नागरिक शेखर नाईक म्हणाले की, या जंक्शनच्या ठिकाणी सुमारे आठ रस्त्यांवरून येणारे लोक एकत्रित होतात. परंतु त्यांना हा महामार्ग पार करणे जीवघेणे ठरलेले आहे. तसेच तेथील सर्व्हिस रोडही अतिशय कमी रुंदीचा आहे.
म्हापसा येथील वाहतूक विभागाच्या अधिकाऱयांनी ही बाब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्या जंक्शनच्या ठिकाणी वाहन चालकांना भेडसावणाऱया समस्याही त्यांनी प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना घेतल्या जाऊ शकतात त्याबाबतच्या सूचनाही वाहतूक विभागाने प्राधिकरणाला केल्या आहेत.
या जंक्शनच्या ठिकाणी उद्भवणाऱया समस्यांची आम्हाला जाणीव असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे साहाय्यक अभियंता दिनेश तार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्गावर पेडे जंक्शनच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. ही समस्या सरकारने लवकरात लवकर सोडविणे आवश्यक आहे. तिथे उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन राज्य सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. पम त्याबाबत अजूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गाचे साहाय्यक अभियंता दिनेश तार यांनी सांगितले की, पेडे जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी केली असली तरी त्यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमोर कोणताही प्रस्ताव आला नव्हता. सध्या प्रकल्प पूर्णत्वास आला असल्याने त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची कोणतीही तजवीज नाही. सध्या महामार्गाचा प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देत आहोत, असेही ते म्हणाले.