प्रतिनिधी /पेडणे
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या ‘जल शक्ती अभियान’ अंतर्गत सरकारी माध्यमिक विद्यालय तोर्सेच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) तुकडीने धवरुख संस्थेच्या मदतीने शाळेच्या आवारात भूजल संवर्धन प्रकल्प साकारला.
प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात पेडणेचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रविण आर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जि. पं. सदस्य सीमा खडपे, तोर्से सरपंच उत्तम वीर, उगवे सरपंच सरस्वती नाईक, माजी जि. पं. सदस्य रमेश सावळ, प्रार्थना मोटे, पंच सदस्य सूर्यकांत तोरसकर, मनोहर नाईक, जॉन ब्रीट डिसोजा, अशोक सावळ, पा. शि. संघाचे अध्यक्ष संजय महाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जया सावळ, नीता तोरसकर, नवचेतना संस्थेचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, पत्रकार निवृत्ती शिरोडकर, महादेव गवंडी, उमेश गाड, निसर्गप्रेमी विक्रमादित्य पणशीकर व शाळेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रेडकर उपस्थित होते.
पेडणे तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे येथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो. पण जलसंवर्धनाअभावी जास्तीजास्त पाणी नदी वाटे समुद्रात जाते. त्यामुळे पावसाळी हंगाम वगळता तब्बल आठ महिने या तालुक्मयातील काही भागात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करायची असेल तर प्रत्येक घराने, सरकारी बिगर सरकारी आस्थापनाने माननीय पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने सुरू झालेल्या जल शक्ती अभियानांतर्गत ‘भूजल संवर्धन प्रकल्प’ साकारणे काळाची गरज आहे, असे मत आमदार आर्लेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
सरकारी माध्यमिक विद्यालय तोर्से येथे राष्ट्रीय छात्र सेना तुकडीने मांदे येथील “धवरुख” संस्थेच्या मदतीने साकारलेल्या भूजल संवर्धन प्रकल्पाद्वारे 50000 लिटर पेक्षा जास्त पाणी जमिनींमध्ये जिरवले जाईल जेणेकरून आजूबाजूंच्या विहिरीतील पाण्याचा स्तर उंचवण्यात नक्कीच मदत होऊन भूजल पातळीत वाढ होईल. एनसीसी अधिकारी साहिल कळंगुटकर यांनी ‘हर घर भूजल’ प्रकल्प प्रत्येकाने वयक्तिक पातळीवर राबवावा व त्यासाठी लागणारे सहकार्य व मार्गदर्शन एनसीसी तुकडीतर्फे व प्रकल्पासाठी लागणारे ब्यारल धवरुख संस्थेतर्फे मोफत पुरविण्यात येतील असे सांगितले. मुख्याध्यापिका राजेश्री रेडकर यांनीही ‘हर घर भूजल’ प्रकल्प उपक्रमाची गरज असल्याचे सांगितले.
राजेश्री रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी साहिल कळंगुटकर, शिक्षक समीर शेटमांदेकर, गौरव नाईक, साईश आरोलकर व छात्रसैनिक चारुदत्त म्हामल, मनोहर महाले, वासू नाईक, स्वरूप झांटय़े, कृष्णा काटकर, पार्थ सावंत यांनी साकारला. धवरुख संस्थेचे अध्यक्ष रुदेश म्हामल व निसर्गप्रेमी तथा भूजल संवर्धन अभियानाचे प्रमुख विक्रमादित्य पणशीकर यांचे यसाठी विशेष मार्गदर्शन लाभले.