करमाळा प्रतिनिधी
आदिशक्ती जगदंबेच्या उपासनेला वेदपूर्व काळापासून प्रारंभ झाल्याचे आढळून येते, त्यानंतरच्या कालखंडात पुराण वाड:मयात देवीच्या अनेक अवतार कथा निर्माण झाल्या. प्रामुख्याने स्कंद पुराण मार्कंडेयपुराण व देवी भागवत या ग्रंथात देवीभवानी चे अनेक अवतार कथांचा निर्देश आढळून येतो, सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश हा उद्देश या कथांमधून दिसून येतो. तसेच देवीचे महात्म्य वर्णन व उत्पत्ती बाबत सप्तशती मध्ये उल्लेख आढळतो ,नवरात्रीच्या नऊ दिवसात भवानी मातेचे नऊ रुपात पूजा केली.
पहिल्या दिवशी शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या दुर्गाआईची, दुसऱ्या दिवशी शक्तीचे प्रतीक दुर्गादेवीची, तिसऱ्या दिवशी सौंदर्य व शौर्याचे प्रतीक असलेल्या चंद्रघंटा, देवीची चौथ्या दिवशी विश्वाची निर्मिती करणाऱ्या कुष्मांडा देवीची, पाचव्या दिवशी स्कंदमाता म्हणजे शुर योध्दा स्कंद याच्या आईची, सहाव्या दिवशी तीन डोळे चार हात असलेल्या कात्यायनी मातेची, सातव्या दिवशी लोकांना निर्भय बनविणा-या काळरात्री देवीची, आठव्या दिवशी शांती व शहाणपण यांचे प्रतीक असलेल्या महागौरीची, तर आजच्या नवव्या दिवशी सर्वसिध्दी प्राप्त केलेल्या व जीची योगी व ऋषीसुध्दा पुजा करतात .अशा सिध्दीदात्री देवीची पुजा करतात, अशा शक्ती स्वरुपीनी देवतांचा हा नवरात्र उत्सव महाराष्ट्रात शक्ती स्थळांची साडेतीन पीठ मानले जातात, त्यापैकी तुळजापूरची तुळजाभवानी एक अखंड पीठ मानले जाते, तुळजाभवानीचा अवतार अशी भक्तांची श्रद्धा असणारी करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील श्री कमला भवानी माता मानली जाते, करमाळ्यापासून पूर्वेला अर्धा किलोमीटर अंतरावर कमलाभवानी मातेचे भव्य मंदिर असून या मंदिराची उभारणी इ.सन १८२७ मध्ये राजेरावरंभा निंबाळकर यांनी केली आहे. या मंदिर उभारणीबाबत एक दंतकथा सांगितली जाते राजे निंबाळकर हे निजामशाही सरदार होते ,त्यांच्याकडे करमाळा, माढा व परांडा परगण्याची जहागिरी होती, रावरंभा राजेची तुळजाभवानी मातेवर भक्ती होती, राजे रोज घोड्यावर स्वार होऊन तुळजापुरला दर्शनासाठी जात असत ,राजांची भक्ती व श्रद्धा पाहून भवानी मातेने प्रसन्न होऊन राजाला दृष्टान्त दिला आणि वर मागण्यास सांगितले.
राजांनी भवानी मातेला करमाळा येथे वास्तव्यास यावे असा वर मागितला. भवानीमातेने राजाची मागणी मान्य केली परंतु एक अट घातली, ती अशी की राजाने करमाळा येथे पोहोचेपर्यंत मागे वळून पाहायचे नाही, जीथे राजा वळून पाहिल, त्या ठिकाणी मी थांबणार , राजाने ही गोष्ट मान्य केली, अशा रीतीने वायु वेगाने राजे करमाळा कडे निघाले, त्याप्रमाणे राजापुढे व भवानी माता मागे असे मार्गक्रमण सुरू झाले .करमाळा शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आल्यानंतर राजाने अधीर होऊन व आनंदाने पाठीमागे पाहिले, असता राजाला भवानीमातेचे साक्षात दर्शन झाले. व तुळजाभवानी माता तिथेच अंतर्धान पावली त्या ठिकाणी राजांनी भवानी मातेचे भव्य मंदिर उभारले. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.
त्या मंदिरामध्ये असणारी भवानी मातेला कमलाभवानी माता असे म्हटले जाते. भवानी मातेची मूर्ती गंडकी पाषाणातील असून अष्टभुजा स्वरूपात असलेले आहे. भवानीमातेच्या हातांमध्ये शंख ,चक्र, गदा, तलवार व महादेवाची पिंड असून सिंहावर आरूढ झालेली आहे. पायाखाली दैत्य असून युद्धप्रसंगीची भावमुद्रा आहे. मंदिराची उभारणी राजे रावरंभा निंबाळकर यांनी केली असून मंदिराच्या भोवती असणारी दुहेरी तटबंदी गोपुरे नगारखाना ही सर्व शिल्पे त्यांचे पुत्र जानोजी राज यांनी उभारले आहेत. मंदिरामध्ये भव्य अशा तीन दीपमाळा असून त्यांच्या आत मधून वरचे टोकापर्यंत जाण्यासाठी पायर्या आहेत. या दीप माळेवरुन करमाळा शहराचे दर्शन होते .करमाळा शहरांमध्ये प्रवेश करीत असताना कमलाभवानी चे मंदिर व मंदिराच्या भोवताली असणारे दक्षिणात्य पद्धतीची प्रचंड गोपुरी नजरेस पडतात. कमलादेवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून पश्चिमेकडून मोठे प्रवेशद्वार आहे. मंदिरात दुहेरी तटबंदी असून पश्चिमेकडील प्रवेशद्वाराच्या दोन्ही वेशीवर दोन प्रचंड दक्षिणात्य शैली मधील गोपुर बांधलेले आहेत. दुहेरी तटबंदीच्या आतील बाजूस भाविकांच्या महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी होते. कमलादेवीच्या मंदिरामध्ये देवीचे पंचायतन स्थापन झालेले आहे. मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर प्रथम शिवमंदिर व नंतर गणपतीचे मंदिर आहे. प्रदक्षिणा ओलांडून पुढे गेल्यानंतर सात मुखी घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्यनारायणाचे मंदिर आहे. व शेवटी गरुडावर आरूढ असलेल्या श्री लक्ष्मी विष्णू चे मंदिर आहे .ते कमलाभवानी मूर्ती अप्रतिम असून भवानीमाता अष्टभुजा असून सिंहावर आरूढ झालेली आहे. व महिषासुराचे मर्दन करत आहे.
देवीचे वस्त्र अलंकार पाषाणात कोरलेले आहेत .देवीला नवरात्रात उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. नवरात्रामध्ये रोज दोन वेळा आरती प्रदक्षिणा व अष्टक पठण या कार्यक्रमाला हजारो भाविक हजेरी लावतात. तसेच इतर अनेक कार्यक्रम होतात, तसेच सध्या नवरात्रात रोज अन्नछत्र मंडळाकडून महाप्रसाद वाटप केले जाते. याचा हजारो भाविक लाभ घेतात. नवरात्रा मध्ये निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लाखो भाविक नवरात्रामध्ये भवानीमातेच्या दर्शनाचा लाभ घेतात.
मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे राजे रावरंभा निंबाळकर यांनी मंदिर उभारणी करतेवेळी ९६ या शंकेला विशेष महत्त्व असून ९६ पायऱ्यांची बारव अप्रतिम बांधलेले आहे. अशी मंदिराची रचना असून मंदिराची उभारणी हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन विश्वस्त असून मंदिराचे कामकाजाचे नियोजन करतात, तसेच गावांमध्ये पुजारी व मानकरी ही आपली दिलेली सेवा कायमस्वरूपी बजावतात. मंदिराचा परिसर भव्य दिव्य असून भाविक दर्शनासाठी मंत्रमुग्ध होतात