गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव ( ता. करवीर ) ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत गांधीनगर सुधारित प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये मंजूर झालेल्या तीन टाकी पैकी गोकुळ शिरगावच्या दक्षिणेस असलेल्या गट नंबर 45 ही जागा करवीर निवासिनी देवी असलेल्या जागेमध्ये एक पाण्याची टाकी बांधण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांचेकडे या गट नंबर मधील चार गुंठे जागेची टाकी बांधणे करता ना हरकत दाखला मागणी केली. पण देवस्थान समितीने ही जागा देता येणार नाही म्हणून दिनांक 18/7/ 2023 रोजी असे प्राप्त पत्र दिले आहे. पण त्याच दिवशी वैयक्तिक कारणासाठी 18/ 7 23 रोजी हीच जागा डॉ. शरद जगन्नाथ टोककर यांना सदर क्षेत्रामध्ये वन औषधी वनस्पती लागवड करणे, विद्युत कनेक्शन घेणे, तात्पुरते पत्र्याचे शेड उभा करणे यासाठीची मान्यता दिलेले पत्र हाती लागले आहे. त्यामुळे देवस्थान समिती यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी चार गुंठे जागेसाठी परवानगी मिळत नाही पण याच जागेवर ही परवानगी कशी मिळते? यासंबंधीचा सवाल सुद्धा जिल्हाधिकारी यांना विचारणार असल्याचे गोकुळ शिरगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत गोकुळ शिरगाव मध्ये पत्रकार बैठकीत सांगितले.
यावेळी या पत्रकार बैठकीला गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, उपसरपंच संगीता गवळी, नूतन पाटील ,अश्विनी कांबळे, शामराव पाटील रणजीत पाटील, अंबिका पाटील, संगीता पाटील, राहुल सुतार, रूपाली महाकवे, प्रियंका सातपुते, शिवाजी गवळी, संदीप पाटील, संभाजी मिठारी, साताप्पा कांबळे, सुनील पाटील, यशवंत पाटील, राजाराम शिंदे, विकास पाटील, शंकरराव पाटील आदीसह यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी गोकुळ शिरगाव गावातील जमिनी एमआयडीसीसाठी अडीचशे एकर, विमानतळासाठी दीडशे एकर, तलावासाठी बेचाळीस एकर, एमएसईबी कॅनॉल साठी 25 एकर, तसेच गायरान जमिनीवर विमानतळासाठी ट्रक टर्मिनल या नावाने आरक्षण टाकले आहे. त्यामुळे या गावासाठी आता मोकळी जागा कुठेही शिल्लक राहिली नाही .इतकी जागा राज्याच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेली असताना सदरची फक्त चार गुंठे जमीन ही ग्रामपंचायतला पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी मिळत नसल्याने मनामध्ये चीड व खंत निर्माण होत असल्याचे ग्रामस्थ यावेळी बोलत होते. सोमवारी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत मिळून जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देणार असून त्यांनी लवकरच याची सखोल चौकशी करावी अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करू असा ग्रामस्थांनी यावेळी इशारा दिला आहे