सातारा,प्रतिनिधी
राज्यात पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार कुचराई करत असल्याच्या निषेधार्ह साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय.सातारा शहरासह तालुक्याच्या ठिकाणी निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.
पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही.राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करतात.2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले.त्यांना शिविगाळ केली गेली असून, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्यात.त्यानंतरही केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेलाय.कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे.याचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.