मागील श्लोकात निर्विंध्या नदीला सुंदर स्त्रीची उपमा दिली आहे, तर सिंधु नदीला कृश स्त्रीची उपमा दिली आहे. आता यक्ष मेघाला उज्जैनीचे वर्णन पुढील श्लोकातून
सांगतो….
प्राप्यावन्तीनुदयनकथाकोविदग्रामवृद्धान्
पूर्वोद्दिष्टानमनुसर पुरिं श्रीविशालां विशालाम्।
स्वल्पीभूते सुचरितफले स्वर्गिणां गां गतानां
शेषैः पुण्यैर्ह्रतमिव दिवः कान्तमित्खण्डमेकम्।।30।।
अर्थः-उदयन राजाच्या गोष्टी जाणणारे वृद्ध खेडवळ असलेल्या, अवन्ती देशाला पोचल्यावर, पुण्यकर्माचे फळ संपुष्टात आल्यामुळे भूलोकी गेलेल्या, स्वर्गात राहणाऱयांच्या शिल्लक राहिलेल्या पुण्याईने ओढून आणलेल्या स्वर्गाच्या एका देदिप्यमान तुकडय़ाप्रमाणे असलेल्या, पूर्वी सांगितलेल्या अतिशय समृद्ध अशा उज्जैनी नगरीला जा.
नर्मदेच्या उत्तरेला असलेल्या माळव्यातील प्रदेशाला अवंती देश म्हणतात. उज्जयिनी ही त्याची राजधानी आहे. उदयन हा चंद्रवंशातील राजा होता. तर साहस्त्रानीक राजाचा पुत्र होता. तो वत्स देशाचा राजा असल्याने त्याला वत्सराजही म्हणतात. त्याची कोशाम्बी ही राजधानी होती. ह्याच उदयन राजाच्या कथानकावर आधारित भास कविने ‘स्वप्नवासवदत्ता’ हे नाटक लिहीले आहे. उज्जयिनी नगरी इतकी समृद्ध होती की, जणू काही भूलोकीचा स्वर्गच!
यक्ष पुढे उज्जैनीबद्दल आणखी काय म्हणतो ते
पाहूया!…..
दीर्घीकुर्वन्पटु मदकलं कूजितं सारसानां
प्रत्यूषेषु स्फुटितकमलामोदमैत्रीकषायः।
यत्र स्त्रीणां हरति सूरतग्लानिमङ्गानुकूलः
शिप्रावातः प्रियतम इव प्रार्थनाचाटुकारः ।।31।।
अर्थः- तिथे त्या विशाल नगरीत रतिसुखासाठी आपल्या प्रियेचा अनुनय करणाऱया प्रियकराप्रमाणे अंगाला गोड वाटणारा, फुललेल्या कमळाच्या परिमलामुळे सुगंधित झालेला, शिप्रा नदीवरील वारा, रोज सकाळी सारसपक्ष्यांच्या मधुर कूजनाचा वाढणारा आवाज स्त्रियांचा थकवा घालवणारा असतो.
वरील श्लोकात शिप्रावाताला प्रियकराची उपमा दिली आहे. ह्या श्लोकात ‘उपमा’ अलंकार वापरला आहे.