पुणे / प्रतिनिधी :
कर्नाटकमध्ये नवीन सरकर येताच त्याचे दुष्परिणाम दिसून लागले असून त्यांच्याकडे राज्याच्या विकासासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी बजेट नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकारला मंगळवारी टार्गेट केले. हीच परिस्थिती राजस्थानमध्येपण आहे. तिथली विकासकामे ठप्प आहेत, असा टोलाही त्यांनी राजस्थान सरकारला मारला.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन पार पडले. यामध्ये ‘वनाज ते रुबी हॉल’ आणि ‘सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय’ या मर्गांचा समावेश आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण पार पाडले यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, फिनटेक, बायोटेक, ऍग्रीटेक; प्रत्येक क्षेत्रात देश प्रगती करत आहे. याचा मोठा लाभ पुण्यालादेखील होतोय. एकीकडे महाराष्ट्रात विकास होतोय तर दुसरीकडे शेजारचे राज्य कर्नाटकात काय होत आहे ते समोर येत आहे. बंगळूरू मोठे आयटी हब आणि ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटर आहे. यावेळी कर्नाटकाचा गतीने विकास होणं अपेक्षित होते. परंतु, सरकार बदलले आणि जनतेचे नुकसान झाले. कर्नाटकमध्ये ज्या प्राकरच्या घोषणा करुन सरकार बनवले त्याचे दुष्परिणाम कमी वेळेत दिसून येऊ लागले आहेत. कर्नाटक सरकार मान्य करत आहे की, त्यांच्याकडे बंगळूरु आणि कर्नाटकाच्या विकासासाठी बजेट नाही. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. कर्जाचा बोजा वाढतोय आणि विकास ठप्प झाला आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.