सरकारने आयआयटी प्रकल्प जनतेवर लादल्याचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
देशात पहिल्यांदाच आदर्श निर्माण करीत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राबविलेल्या गोवा ग्राम संपूर्ण यात्रेच्या समारोप कार्यक्रमात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नियोजित आयआयटी प्रकल्पावर आक्षेप घेत हा प्रकल्प सरकारने जनतेवर लादला असल्याचे सांगितले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनीच जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष घालावे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली. नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात धान्य सडत असताना सरकारला याचे काहीच पडलेले नाही. रस्ता अपघातातही निष्पाप लोकांचा बळी जात असताना सरकार उदासीन बनल्याने ते म्हणाले
राजभवन येथे गोवा ग्राम संपूर्ण यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमात व्हर्च्युअल भाग घेतला.
राज्यपाल पिल्लई म्हणाले, लोकांनी विश्वास ठेवून सरकारला पाच वर्षांसाठी निवडले आहे. विद्यमान भाजप सरकार लोकांसाठी चांगले काम करत आहे. विरोधी नेत्यांनी त्यांना काम करू द्यावे. विरोधी नेत्यांनी राजभवनमध्ये आपले प्रश्न न मांडता विधानसभेत ते सादर करावे, अशा शब्दांत युरी आलेमाव यांच्या प्रश्नांना राज्यपालांनी उत्तर दिले.
वाद केवळ क्षुल्लक लोकांकडून ः आरिफ मोहम्मद
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, केरळमध्ये जरी सरकार आणि कम्युनिस्ट पक्षात वाद असला तरी असे वाद हे केवळ क्षुल्लक लोकांकडून निर्माण केले जातात. त्यांना सरकारला सहकार्य करणे जमत नसल्यानेच ते विरोधक आपल्या भाषणातून वादग्रस्त मुद्दे उपस्थित करतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे.
जनतेच्या तक्रारी संबंधित खात्याकडे….
15 महिने चाललेल्या गोवा ग्राम संपूर्ण यात्रेदरम्यान राज्यातील 421 गावे आणि 191 पंचायतांतील प्रतिनिधींशी आपण संवाद साधला आहे. या दरम्यान नागरिकांकडून पाणी, वीज आणि इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या तक्रारी आपल्याकडे आल्या. जनतेचे प्रश्न, समस्या संबंधित खात्यामार्फेत आपण पोहोचवल्या असल्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.
युरींनी उठवला शासकीय समारंभाचा फायदा
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल राजभवन येथे गोवा ग्राम संपूर्ण यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहून सरकारवर विविध आरोप करीत तोफ डागली. कर्नाटक सरकार मांडवीचे पाणी पळवत असल्याचाही त्यांनी आरोप करीत अन्न सुरक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या शासकीय समारंभात पहिल्यांदाच बोलण्याची संधी मिळाल्यानंतर युरी आलेमाव यांनी सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या.
पुस्तक रुपात राज्यपाल अनुभव मांडणार
15 महिने गोवा ग्राम संपूर्ण यात्रा राबविल्यानंतर आलेले अनुभव व मिळालेली माहिती पुस्तकरुपात प्रकाशित करणार आहेत. गोव्यातील ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे, सात बेटे या विषयावर राज्यपाल पुस्तक लिहिणार आहेत. राज्यातील अनेक पर्यटन स्थळे नव्याने नागरिकांसमोर येण्यासाठी ही पुस्तके प्रकाशित होतील, असे राज्यपालांनी सांगितले.