कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लवकरच निर्णय
शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत
विजय पाटील, सरवडे
Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी 2014 पासून विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा ठेवला आहे.मात्र राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या उमेदवारीला पाठबळ मिळत नसल्याने त्यांची घुसमट होत आहे.आगामी विधानसभा निवडणुकीतही पक्षातर्फे उमेदवारीची संधी सहज शक्य नसल्याने राष्ट्रवादी पक्षाचे घडय़ाळ सोडण्याच्या तयारीत असून लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
जिह्यात राष्ट्रवादी पक्षाची भक्कम ताकद कांही तालुक्यातच पहावयास मिळते.यामध्ये राधानगरी व भुदरगड तालुक्यात स्थान मजबूत आहे.मात्र आता बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील आणि जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील या मेहुण्या-पाहुण्यातील छुप्या संघर्षाचे राजकारण उघड होत आहे.अनेक सत्ता काबीज करणार्या या दोन्ही नेत्यांना विधानसभा लढवण्याची तीव्र इच्छा असल्याने एकत्र राहून दोघांना हे शक्य नसल्याने आता मतभेदाची दरी रुंदावत चालली आहे.दोन वेळा पराभव झाल्याने त्याचे शल्य पुसून टाकण्यासाठी के.पी.पाटील पुन्हा विधानसभा लढविण्साठी इच्छुक आहेत.तर अनेक पदे भुषवल्यानंतर आता आमदारकीची संधी मिळावी या भावनेने ए.वाय.पाटील तयारी करीत आहेत.
केवळ विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन या दोन नेत्यांमधील छुपा वाद यापुर्वीही चर्चेत होता मात्र, अंतिम क्षणी हा वाद मिटल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.या दोन नेत्यांमध्ये फूट पडली तर राष्ट्रवादी पक्षाचे नुकसान होणार हे कार्यकर्ते जाणत असल्याने दोघांमध्ये एकोपा रहावा ही भावना बहुतांशी कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.या दोघांमध्ये कधीही उघड संघर्ष झाला नसला तरी आपण योग्य असल्याचे भासवताना कार्यकर्त्यांना मात्र वेठीस धरले जात आहे.दोघांमधील अंतर्गत असणारा वाद आता पुन्हा उफाळून आल्याने कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत.
हेही वाचा- Kolhapur Election: पाच ग्रामपंचायतींसाठी 1 नोव्हेंबरला आरक्षण सोडत
दोन वेळा माघार घेतल्याने आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढविण्याचा चंग ए.वाय.पाटील यांनी बांधला असताना राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारीची शाश्वती नसल्याने पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत.भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे.यादृष्टीने राज्यातील सताधारी असलेल्या शिंदे गटाच्या माध्यमातून एखादे चांगले पद मिळवण्यासाठी शिंदे गटाशी हातमिळवणी करतील असे संकेत मिळत आहेत.तर लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
राष्ट्रवादीला फटका
जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील यांनी राधानगरी विधानसभा सभा मतदार संघात चांगली मोट बांधली आहे.ए.वाय यांनी हा पक्ष सोडल्यास बिद्री साखर कारखाना,पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा यांच्यासह विविध निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार आहेत.एक वजनदार नेता गेल्याने राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठा फटका बसणार आहे.तर विरोधी गटाला राष्ट्रवादीच्या फूटीचा निश्चितच लाभ होणार आहे.