ऊसाच्या वाढीव दरामुळे उत्पादकांसाठी यंदाचा गुळ हंगाम आव्हानात्मक
कोल्हापूर/धीरज बरगे
कोल्हापूरची ओळख असणारा येथील गुळ उद्योग यंदा मोठ्या संकटात सापडणार आहे. ऊसाला वाढीव दर मिळण्यासाठी शेतकरी संघटनांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळे यंदा ऊसाला गत हंगामाच्या तुलनेत वाढीव दर मिळणार आहे. ऊसाच्या वाढीव दरामुळे जिल्ह्यातील गुळ उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम आव्हानात्मकच राहणारा आहे. उत्पादन खर्च आणि मिळणार दर यामधील तफावत पाहिल्यास यंदाच्या हंगामात गुळाला प्रति क्विंटल चार हजारांहून अधिक दर मिळाला तरच जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरे टिकणार आहेत. अन्यथा गुऱ्हाळांची धुराडी पेटवणे गुळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुश्कील बनणार आहे.
गुऱ्हाळ घरांचा जिल्हा अशी कोल्हापूरची ओळख आहे. येथील शेतकऱ्यांकडून उत्पादित होणाऱ्या दर्जेदार गुळाने कोल्हापूरची ओळख देशभर पोहोचवली आहे. जिल्ह्यात एकेकाळी एक हजारांहून अधिक गुऱ्हाळघरे होती. मात्र ऊसाचा दर वाढत गेला तसा जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांचा आकडा कमी होत गेला. वाढलेला उत्पादन खर्च, कामगारांची कमतरता, खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी दर अशी अनेक आव्हाने गुळ उद्योगासमोर उभारत गेली. अशा आव्हानात्मक स्थितीतही सुमारे दोनशे गुळ उत्पादकांनी कोल्हापूरची ही ओळख आजही जिवंत ठेवली आहे. मात्र यंदाच्या हंगामात ऊस दरात वाढ झाल्यास त्या तुलनेत गुळाला दर न मिळाल्यास गुऱ्हाळ घरे पूर्णत: बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रति क्विंटल 4 हजारांहून अधिक दर आवश्यक
गत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये आणि यंदाच्या हंगामात प्रतिटन चार हजार रुपये दर मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे ऊसाला यंदा वाढीव दर मिळण्याची दाट शक्यता आहे. ऊसाला वाढीव दर मिळाल्यास गुळालाही त्या तुलनेत किमान चार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळणे आवश्यक आहे.
घटलेल्या ऊस उत्पादनाचाही बसणार फटका
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर यंदा ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांकडून यंदा ऊसाची पळवापळवी होणार आहे. यंदाचा साखर हंगामही लवकर संपणार, असे मत जाणकारांमधून व्यक्त होणार आहे. त्यामुळे हंगाम सुरु झाल्यानंतर ऊसासाठी कारखानदारांमध्येच स्पर्धा निर्माण होणार आहे. या स्पर्धेत गुळ उत्पादकांच्या हाताला किती ऊस लागणार, हे देखील पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे घटलेल्या ऊस उत्पादनाचाही गुळ उत्पादकांना फटका बसणार आहे.
दहा वर्षात सरासरी दर सारखाच
दहा वर्षात उसाचा दर वाढला. कामगारांची हजेरी, उत्पादन साहित्यांचेही दर वाढले. मात्र गुळाचा दर प्रतवारीनुसार 3500 ते 3800 रुपये प्रति क्विंटल असा सारखाच राहिला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला, मात्र व्यावसायिकांचे उत्पन्न तेवढेच राहिल्याने गुळ व्यवसाय सध्या तोट्याचा बनला आहे.
साडेतीन हजार टनाने घटले उत्पादन
कोल्हापूर बाजार समितीमध्ये तीन वर्षात 30 किलो गूळ रव्यांची झालेली आवक पाहता यामध्ये सुमारे साडेतीन हजार टनाने जिल्ह्यातील गुळ उत्पादन घटले आहे. गत हंगामातील आकडेवारी पाहता सुमारे एक लाखाने गुळ रव्यांची आवक कमी झाली आहे.
शासनाच्या पाठबळाची गरज
गूळ व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिकांना स्वत:च विविध पातळीवर आर्थिक तरतूद करावी लागते. यामधून उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्याने व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 1100 असणारी गुऱ्हाळ घरांची संख्या सध्या दोनशेवर आली आहे. कोल्हापूरची ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी गूळ व्यवसायाला शासनाने विविध पातळीवर पाठबळ देण्याची गरज आहे.
किमान हमीभाव चार हजार मिळावा
गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने हा व्यवसाय सध्या तोट्याचा ठरत आहे. जिल्ह्यातील गुळ व्यवसाय टिकण्यासाठी गुळाला किमान चार हजार रुपये हमीभाव मिळणे गरजेचे आहे. या हंगामात ऊसाला वाढीव दर मिळणार आहे. त्यामुळे गुळालाही प्रति क्विंटल चार हजारांहून अधिक दर मिळाला तरच गुळ उत्पादकांना गुऱ्हाळ घरे चालवणे शक्य होणार आहे.विजय जाधव, अध्यक्ष, जिल्हा गूळ उत्पादक संघटना
तीन वर्षात कोल्हापूर बाजार समितीमध्ये झालेली गुळ रव्यांची आवक
वर्ष गुळ रव्यांची संख्या (प्रतिकिलो 30 प्रमाणे)
2020-21 23 लाख 14 हजार 050
2021 -22 22 लाख 94 हजार 070
2022-23 सुमारे 22 लाख.