कसबा बीड : प्रतिनिधी
17 ऑक्टोबरपासून सुरु झालेली ‘ स्वाभिमानी ‘ ची आक्रोश पदयात्रा शिरोळ व कागल, करवीर तालुक्यातील प्रत्येक कारखान्यांवर जाऊन धडकली. आज ही जन आक्रोश पदयात्रा करवीर तालुक्यातील महे येथून कोगे गावात आली. शेतकरी बांधवांनी माजी खासदार शेट्टी यांचे बरोबर आलेल्या शेतकरी बांधवांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. यावेळी बोलताना शेट्टी यांनी ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे…ती भंगारभावात देऊ नका असे आवाहन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले “5 वर्षापूर्वी 2800 रुपये एफआरपी होता व आता 3250 रुपये आहे. तोडणी खर्च जाता शेतकऱ्यांना ऊस शेती परवडत नाही. शेतकरी अडचणीत म्हणून बाजारपेठ व्यापार ठप्प आहे. मागील हिशेबात 400 प्रमाणे मिळाले तर 15 लाख शेतकरी सुखी होईल. साखर कारखान्यांच्या 37 लोकांच्या घशात नको तर शेतकऱ्यांच्या खिशात आले पाहिजे. ऊस कमी असल्याने गु-हाळ घरे बंद करावयाचे आदेश शासन स्तरावर घेतले जात आहे, हे चुकीचे आहे. ऊस पाहिजे असेल तर दर जास्त देणे गरजेचे आहे. साखर निर्यात बंदी , रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या. केंद्रास जाब विचारणे अपेक्षित आहे . राज्य साखर संघास कारखान्यांकडून पोत्याला 2 रुपये दिले जाते. जगात स्वस्त इथेनॉल भारतात स्वस्त, ब्राझील 2 नंबर आहे. ब्राझील येथे 60 रू इथेनॉल व आपले 49 रुपये. राज्य सरकार व साखर संघ यांनी मिळून इथेनॉल व पेट्रोल मिक्स 110 रु वाढीने विकतात. म्हणजे 57 रुपये नेट प्रॉफीट घेत आहे.साखर उद्योग धोक्यात आहे असे भासविले जात आहे. यावर्षी 90 दिवस कारखाना चालणे कठीण आहे,मागचा हिशेब पूर्ण करत नाही तोपर्यत ऊसाचे कांडे देऊ नका यावर ठाम रहा. जेव्हा बाजारपेठेत मागणी पेक्षा पुरवठा घटला तेव्हा दर वाढतात. पुरवढा वाढला की दर कमी होतात. त्यामुळे सोन्याची कांडी भंगार भावात देऊ नका.” असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
यावेळी कोगे ग्रामपंचायतींच्या वतीने सरपंच बनाबाई यादव व उपसरपंच नामदेव सुतार यांच्या हस्ते राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोगे गावातील ज्या शेतकरी बांधवांनी आलेल्या पदयात्रेमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या भोजनाची ज्या बांधवांनी सोय केली त्यांचे शेतकरी संघटनेच्यावतीने कौतुक झाले.
कोगे गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, कुंभी- कासारी साखर कारखान्यांचे व्हा. चेअरमन विश्वास पाटील, कै. सखाराम शिवा दूध संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, करवीर युवक कॉंग्रेस ग्रामीण अध्यक्ष स्वप्निल पाटील, कसबा बीडचे मुंकुंदराव पाटील, बाजीराव देवाळकर, मयुर वरुटे, महे गावचे सरपंच सज्जन पाटील, जगदीश पाटील ,कोगे गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कसबा बीड भागातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ मोरे, प्रास्ताविक दिपक पाटील, स्वागत बाजीराव पाटील व आभार बळीराम चव्हाण यांनी केले.
नाणंद येथे 7 तारखेला ऐतिहासिक ऊस परिषदे होणार आहे. या ऊस परिषदेसाठी सर्वानी उपस्थित राहावे. येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना या भागातील 100 गावांनी 2 भाकरी, तांदूळ, व इतर सर्व मिळून 25000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या ऐतिहासिक ऊस परिषद साक्षीदार व्हा असे आवाहनही त्यांनी केले.
आक्रोश पदयात्रेत सहभागी असणारे सर्व शेतकरी बांधव दसरा सण असून रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. म्हणून कोगे येथील शेतकरी बांधव प्रताप निकम, संभाजी चव्हाण , पांडूरंग हारुगले, मारुती चव्हाण, श्रीरंग चव्हाण यांनी आपल्या शेजारील सर्व शेतकरी बांधवांच्या घरी एक घर एक पोळी जमा करून आलेल्या शेतकरी बांधवांचे तोंड गोड केले. भोजनात पोळी, शिरा व भात आमटी याचा समावेश केला. ही जेवणाची व्यवस्था पाहून आलेले शेतकरी बांधव भारावून गेले.