राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा करवीरच्या पश्चिम भागात
वाकरे प्रतिनिधी
सरकार जाणीवपूर्वक पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे असून शेतकऱ्यांचे गेल्या वर्षीच्या हंगामातील तुटलेल्या उसाचा जोपर्यंत हिशोब आणि प्रति टन ४०० रुपये मिळत नाहीत, तोपर्यंत साखरेचा एक कणही बाहेर जाऊ दिला जाणार नाही आणि उसाचे एक कांडेही तुटणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना येथे आयोजित केलेल्या जनआक्रोश पदयात्रेदरम्यान आयोजित केलेल्या सभेत माजी खासदार शेट्टी बोलत होते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.
माजी खासदार शेट्टी यांनी शासनाने साखर निर्यात बंदी केल्याने केली नसती तर साखरेला ५००० रुपये दर मिळाला असता असे सांगून उत्पादन खर्चावर आधारित ऊस दर मिळण्यासाठी साखर कारखानदारांनी शासनाला जाब विचारावा असे ते म्हणाले. उसाच्या उत्पादन खर्चात २४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षात ऊस दर १९२८ वरून २६३२ पर्यंत गेला.ऊस उत्पादन खर्चात ७०३ रुपये वाढ झाली वाढ झाली आणि २८०० रुपये वरून ३१०० रुपये ऊस दर मिळाला, त्यामुळे यातील ४०० रुपये शेतकऱ्यांचा तोटा शेतकऱ्याला मिळावा यासाठी ही जन आक्रोश पदयात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या चार-पाच वर्षात साखर शिल्लक होती, मात्र आता साखरेचा दर वाढल्याने आणि को जनरेशन,उपपदार्थातून अधिक पैसे मिळत असल्याने ४०० रुपयाची मागणी योग्य असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी ४०० रुपये दर मिळाल्याशिवाय उसाचे कांडेही तोडू देऊ नये असे त्यांनी आवाहन केले.
कुंभी कासारी कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी ऊसकरी शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपण रस्त्यावर उतरून लढण्यास तयार असल्याचे सांगून ऊस उत्पादकांना दर मिळावा यासाठी आपण आपली भूमिका सरकारकडे मांडल्याचे ते म्हणाले. शासनाने सुत गिरण्यांना कर्जावरील व्याज दरात सूट दिली आहे, त्याप्रमाणे साखर कारखान्यांना एफआरपी देताना कर्जावर व्याज वाढले आहे, ते सरकारने द्यावे अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे ते म्हणाले.
स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर यांनी केले. पांडुरंग शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, शरद जोशी शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरज कुमार माने तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वच साखर कारखाने बंद ठेवा
कुंभीचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी जिल्ह्यातील काही कारखाने आंदोलन काळात सुरू असतात तर काही कारखाने बंद असतात, त्यामुळे बंद असणाऱ्या कारखान्यांना ५० हजार ते एक लाख टन गाळपाचा फटका बसतो म्हणून शेतकरी संघटनेने सर्वच कारखाने बंद करावेत अशी मागणी केली. याबाबत डावा उजवा असा भेदभाव नको असे ते म्हणाले.
ऑनलाइन काट्याची विधानसभेत मागणी
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपण कुंभी कारखान्याचे चेअरमन असलो तरी आमदार असताना विधानसभेत सर्व साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत अशी मागणी केल्याचे सांगून या संदर्भातील विधासभेतील कामकाजाची माहिती देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.