दिवाळीनंतर गावकऱ्यांशी चर्चा करूनच हद्दवाढ करू आणि कोल्हापूर शहराच्या नजिक असणाऱ्या गावांचाच या हद्दवाढीत समावेश करू अशा प्रकारची खुलासा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ते आज शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज छत्रपती प्रमिलाराजे शासकिय महाविद्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी बोलताना ते म्हणाले, “एकूण 42 कोटींचा निधी या सीपीआरसाठी निधी दिला आहे. त्यापैकी 40 टक्के औषधं खरेदीचा निर्णय अधिष्ठातां यांच्याकडे अधिकार दिले आहेत. जिल्हा नियोजन मंडळातून हे औषधं खरेदी करतो त्याचाही अधिकार अधीष्ठाता यांना दिले आहेत. शासकिय भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. ऑक्टोबर महिन्याअखेर पर्यंत क्लास 3 ची सर्व पदे भरली जाणार आहेत.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “कोल्हापूर शहराच्यानजीक असलेल्या गावांचा हद्दवाढीत समावेश करणार आहोत. दिवाळी झाल्यानंतर गावाकऱ्यासोबत चर्चा करून आम्ही हद्दवाढ करणार आहोत. मागील वेळी माझ्याकडून चुकीचे विधान केले गेलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली.” असेही ते म्हणाले.
इचलकरंजी पाणी योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी “आपल्या हक्काचं पाणी दुसऱ्याला देण्यासाठी जनता तयार नाही. इचलकरंजीला दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाणी देणार आहोत. माजलेवाडी प्रकल्पच्या माध्यमातून हे पाणी देणार.” असेही जाहीर केले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर बोलताना ते म्हणाले, “शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारमध्ये आम्ही समील झालो आहोत. त्यामुळे युतीच्या प्रचारासाठी आम्ही जाणार आहोत. संजय राऊत यांनी कुठली भविष्यवाणी केली आहे याची मला माहित नाही. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि 2024 ला सुद्धा काम करेल.” असेही ते म्हणाले.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकारांसंदर्भात केलेल्या विधानावर पत्रकारांनी पालकमंत्र्याकडे तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्याचे निवेदनही दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांची अशी वक्तव्य असतील आणि ते जर खरे असतील तर निश्चित त्यावर कारवाई करू असे आश्वासनही त्यांनी दिले.