रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहराच्या पाणी योजनेबाबतचा गलथानपणा आजुनही सुरुच आहे. शहरातील मारुती मंदिर परिसरात आज पुन्हा एकदा पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. शिळ धरणातील जॅकवालच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे शहरवासीयांना अद्याप पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. अशातच आज ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. शहरातील या तकलादु पाईपलाईन आणि त्यातुन येणाऱया पाण्याचे प्रेशर याचा अंदाज रत्नागिरी नगरपालिकेला कधी येणार ? आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न नक्की कधी मार्गी लागणार या बाबत आता नागरिकांमधून नाराजीचा सुरु येऊ लागला आहे.
आज रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिर परिसरात नाचणेकडे जाणाऱया रस्त्यावर पुन्हा पाण्याच्या दाबामुळे पाईपलाईन फुटली आहे. दोन दिवसांपूर्वीच इथुनच काही मीटरवर पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. यावेळी करण्यात आलेल्या कामामध्ये पाण्याच्या दाबाचे योग्य नियोजन न झाल्याने आता या नविन ठिकाणी पाण्याच्या दबाव वाढुन पाईपलाईन फुटली आहे. या पाण्याचा दबाव इतका आहे की यामुळे रस्त्याचा काही भाग फुग्यासारखा फुगला आहे. आणि याठिकाणातुन लाखोलिटर पाणी रस्त्यावर वाहुन वाया जात होते. अशातच जवळच असलेल्या नवरात्रीसाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये सर्व पाणी वाहुन गेले आहे. त्यामुळे इथल्या कामाचाही खोळंबा झाला आहे. शिळ धरणातील कोसळलेल्या जॅकवेलचे काम सुरु असल्याने आधिच शहरवासीयांना अपुऱया पाणीपुरवठय़ाचा सामना करावा लागत आहे. अशातच लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जाताना बघुन नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरी शहरात प्रत्येक आठवडय़ात शहरातल्या कोणत्या ना कोणत्या भागात पाण्याच्या दाबा मुळे पाईपलाईन फुटल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे दर आठवडय़ाला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्याचबरोबर या फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी नुकतेच सुस्थितीत आणलेल्या रस्त्यात पुन्हा खड्डे पडत आहेत. आणि पुन्हा एकदा रस्त्यांची दुरावस्था होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी आधीच अपुऱ्या असलेल्या कर्मचारी वर्गाला पुन्हा या कामात जुपले जाते त्यामुळे या कामगारांची नियोजित असलेली कामे बाजुला पडतात. एकुणच शहरात पाईपलाईनचे काम करताना योग्य त्या प्रमाणात पाण्याचा दबाव,रस्त्यांचा चढ आणि उतार तसेच पाईपलाईनची क्वालीटी अशा कितीतरी गोष्टींकडे वारंवार होत असलेले दुर्लक्ष यामुळे शहरवासीयाना पाण्याच्या कमतरतेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.