मतदारांनी चिट्ट्यांच्या माध्यमातून नेत्यांचा घेतला खरपूस समाचार; प्रत्येक निवडणुकीचा तमाशा आणि वग नाट्या वेगळेच; जिह्यात सोयीच्या राजकारणाचा पायंडा रुजला
कृष्णात चौगले कोल्हापूर
Kolhapur market committee जिह्यातील सहकारी संस्था म्हणजे अर्थकारणाचा कणा. या संस्थावर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच नेते प्रयत्नशील असतात. त्यासाठी प्रसंगी पक्षीय राजकारणाला तिलांजली देणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो. संस्थेचा कारभार उत्कृष्टपणे चालवण्यासाठीच आपण राजकारण बाजूला ठेवून एकत्र आल्याचेही ते मतदारांना समर्पकपणे पटवून सांगतात. बाजार समितीच्या निवडणुकीमध्येही अशाच पद्धतीने सोयीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा मतदारांनी मतपेठीत विविध आशयाच्या चिट्टया टाकून खरपूस समाचार घेतला आहे. या निवडणूकीत दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य आणि शिंदे गटाने एकत्र येऊन बाजार समितीवर झेंडा फडकवला असला तरी तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रूचला नसल्याचे मतपेठीतून स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा सत्ताधाऱ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी ते पक्षीय राजकारणातील परस्पर विरोधक आहेत. आगामी विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणूकीत ते एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत. तेथे दोन वेगवेगळ्या व्यासपीठांवरून एकमेकांचे उणेदुणे काढण्यापासून वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपापर्यंत त्यांची वक्तव्ये पहावयास मिळणार आहेत. यापूर्वी झालेल्या अनेक निवडणूकांमध्येही ते परस्परविरोधात होते. पण कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र बाजार समितीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठीच विजयी ठरलेले सत्ताधारी एकत्र आले आहेत. मग गेली 25 वर्षे सत्ता त्यांच्याच ताब्यात असताना त्यांनी बाजार समितीचा विकास का केला नाही ? ‘सेस’ची गळती का रोखली नाही ? तेथील अपप्रवृत्तींना आळा का घातला नाही ? बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न का केला नाही ? 16 ते 17 कोटी रक्कम शिल्लक असताना समिती परिसराचा विकास का साधला नाही ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे हे राज्याच्या राजकारणात भाजपसोबत असले तरी जिह्यातील अन्य सहकारी संस्थांच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. आघाडी धर्मानुसार काँग्रेसही त्यांच्यासोबत आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर आता महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट युतीमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. हे लोण जिह्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणामध्येही दिसणार अशी चर्चा सुरु होती. पण गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासानुसार आमदार कोरे महाविकास आघाडीसोबतच राहिले. आणि शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी सत्ताधारी आघाडी आणखी बळकटी दिली. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी नेत्यांनी एकत्र येऊन विरोधी मोट बांधली तरी सत्ताधारी आघाडीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
आता गद्दार कोणाला म्हणायचे ?
आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ज्यांनी त्यांच्यावर गद्दार म्हणून आरोप केला होता, ते बाजार समितीच्या सत्तेसाठी मांडीला मांडी लावून का बसलेत ? मग आता गद्दार कोण ? असे रोखठोक सवाल मतदारांनी चिठ्ठयांच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. त्यामुळे सोय पाहून तडजोड करणाऱ्या नेत्यांवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
तर चित्र वेगळे असते
राज्यातील पक्षीय राजकारणानुसार जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर हे विरोधी आघाडीसोबत असते, तर सत्ताधारी आघाडीविरोधात निकराची लढत झाली असती. आणि निकालाचे चित्र देखील वेगळे पहावयास मिळाले असते.