वार्ताहर / एकंबे :
कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच रहिमतपूर रेल्वे स्थानकांची उड्डाणपुलाच्या उभारणीच्या निमित्ताने सातारा रहिमतपूर मार्गावरील अवजड वाहतूक कोरेगाव मार्गे वळविण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला आहे. त्यासंबंधीचे आदेश देखील काढण्यात आले आहेत. एकूणच कोरेगाव शहरातील वाहतुकीच्या कोंडीत आता भर पडणार असून अर्धा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सुमारे एक तास वेळ जाणार आहे. कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी अगोदर सोडवा मगच अवजड वाहतूक मगच कोरेगाव मार्गे वळवा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एकूणच कोरेगावातील वाहतूक कोंडीबाबत नागरिकांच्या भावना तीव्र आहेत.
अर्धा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी लागतोय पाऊण तास
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कोरेगाव शहरातील गेले अनेक महिन्यापासून रखडले आहे. वसना नदीवरील पूल ते कुमठे फाटा या जवळपास चार किलोमीटर अंतराचे काम अपूर्ण असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सुमारे 12 साखर कारखान्यांची ऊस वाहतूक कोरेगाव शहरातून होते. अहोरात्र ऊस वाहतुकीची भरलेली व रिकामी वाहने रस्त्यावरून धावत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. एकीकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत पोलीस दलाला घ्यावी लागत आहे. एकंदरीत कोरेगाव शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अर्धा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत होता. आता मात्र हा वेळ वाढत जाणार आहे.
अधिक वाचा : साताऱ्याला आणखी एक दत्ता जाधव परवडणार नाही
सातारा -रहिमतपूर रस्त्यावर धामणेर गावामध्ये रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू असून पोलीस दलाने या मार्गावरील अवजड वाहतूक आता कोरेगावमार्गे वळविण्याचे आदेश काढले आहेत. एक महिना ही अवजड वाहतूक कोरेगाव मार्गे होणार असून कोरेगावच्या वाहतूक कोंडीत निश्चितपणे भर घालणारी ठरणार आहे. अगोदरच कोरेगावात वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचाऱ्यांची कमतरता, त्यातच अवजड वाहतूक वाढल्याने अर्धा किलोमीटर अंतर कापण्यास एक तास वेळ लागण्याची शक्यता आहे.
व्यापारी पेठेला फटका
पोलीस दलाने कोरेगावमार्गे वाहतूक वळवण्याच्या अगोदर कोरेगावातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घ्यावा, वाहतूक सुरळीत कशी होईल, याबाबत प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, अन्यथा कोरेगावात सातत्याने वाहतूक कोंडी होईल. त्याचा फटका थेट बाजारपेठेला बसेल, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील कोरेगावातील वाहतूक कोंडी फोडण्याची मागणी केली आहे. एकूणच कोरेगावातील वाहतूक कोंडीबाबत सर्वसामान्यांच्या भावना तीव्र आहेत.