महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. सह्याद्रीची पट्टमैत्रीण निसर्ग रम्य परिसरातच डोंगराच्या भोवती फेर धरते. कृष्णेची उपनदी महाबळेश्वर येथील एल्फीन्स्टन पॉइंटजवळ कोयनेचा उगम. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पंचगंगा इथे उगम पावतात. पण कोयना मात्र सह्याद्रीच्या भोवतीच फिरते. तिला विरह सहन होत नाही. कारण तिचं हे माहेर जावळीच्या खोऱयात घनदाट जंगलातून तिला बागडायला अंगण देते. तर दऱयाखोरे तिला साद घालतात. उंचच उंच डोंगर, त्याचे अवघड घाट, त्यातून नागमोडी वळणं घेत अवखळपणा करत वाहणारी कोयना सह्याद्रीमधील साथ सुटतांना कोयनेचा हात घट्ट धरून तिच्यात सामावून वहायला लागते.
तिला या सह्याद्रीतच कोयनानगर येथे प्रवाह अडवून धरण बांधून मोठ्ठा प्रकल्प उभारलाय. निसर्गातील शक्तीचा पुरेपूर उपयोग कसा करून घेता येतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे कोयनानगर. दोन हजार मेगावॉट वीज चार टप्प्यात निर्माण करून सारा आसमंतच उजळून टाकला. या कोयनेचा पाणी साठा पन्नास कि.मी.इतका मोठा आहे. यालाच शिवसागर या नावाने ओळखतात. याच परिसरात अफजलखानाचा वध कोयनेच्या साक्षीने घडला.
पर्यटकांना, गिर्यारोहकांना, हा रमणीय परिसर कायमच आकर्षित करतो. कोयना आता महाबळेश्वर येथून कुंभरोशीजवळ वळण घेऊन दक्षिणेकडे वहायला लागते. तिच्या एका बाजूस प्रतापगड दिसायला लागतो. अफजलखान वधाची साक्षीदार होऊन पुढे अंबेनळी आणि पारघाटावर नजर ठेवणारा गुढय़ा दुर्ग भेटतो. जो आदिलशाहीची सत्ता कोकणातून संपवतो आणि हिंदुराष्ट्र बळकट करतो तो या नदीच्या सान्निध्यात. एखादं पाचूचं बेट असावं असा हा परिसर पण पुराणकाळातील महाबळ राक्षसाने इथे उत्पात करायला सुरूवात केली. ज्याचा वध कोणत्या देवाला जमेना तेव्हा आदिशक्तीने त्याला मोहिनी अस्त्राने बांधले आणि मृत्यू दिला.