इंग्लंडविरुद्ध पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यातून रोहित शर्मा बाहेर, बुमराह संघाचा नवा कर्णधार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्ध सुधारित रुपरेषेनुसार उद्यापासून (दि. 1 जुलै) खेळवल्या जाणाऱया पाचव्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्याऐवजी जलद गोलंदाज जसप्रित बुमराहकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. या निवडीमुळे 35 वर्षांच्या कालावधीत जसप्रित बुमराह हा भारतीय संघाचे नेतृत्व भूषवणारा पहिलाच जलद गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, कपिलदेव हा भारताचा शेवटचा जलद गोलंदाज कर्णधार होता. त्याला 1987 मध्ये नेतृत्वावरुन डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर बुमराहच्या निवडीपर्यंत भारताला एकही जलद गोलंदाज कर्णधार म्हणून लाभला नव्हता.
‘रोहित शर्मा येथील पाचव्या कसोटीत खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो अद्याप आयसोलेशनमध्ये आहे. केएल राहुलच्या गैरहजेरीत उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवला गेलेला जसप्रित बुमराह आता नेतृत्वाची धुरा सांभाळेल’, असे बीसीसीआयमधील वरिष्ठ पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
1932 मध्ये पहिली कसोटी खेळणाऱया भारतीय संघाचा जसप्रित बुमराह हा 36 वा कर्णधार असेल. गुजरातच्या या उंचापुऱया गोलंदाजाने आतापर्यंत 29 कसोटी सामन्यात 123 बळी घेतले असून त्याचा जागतिक स्तरावरील सर्वोत्तम जलद गोलंदाजांमध्ये प्राधान्याने समावेश होतो. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बुमराहकडे भविष्यातील कर्णधार या नात्याने पाहिले जाते, असे संकेत यापूर्वीच दिले होते.
भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये जलद गोलंदाजांकडे नेतृत्व सोपवण्याचे प्रमाण कितीतरी सरस राहिले असून त्या देशात इम्रान खान, वासिम अक्रम, वकार युनूससारखे जलद गोलंदाज कर्णधार झाले आहेत. विंडीजमध्ये कर्टनी वॉल्श कर्णधार राहिला असून अगदी अलीकडे ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व जलद गोलंदाज पॅट कमिन्सकडे सोपवले गेले आहे.
सलामीला कोण? पेच कायम
अनुभवी रोहित शर्मा अंतिम एकादशमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा व युवा शुभमन गिलला सलामीला उतरवण्याबद्दल विचारमंथन सुरु आहे. मयांक अगरवालला केवळ राखीव खेळाडू म्हणून पाचारण केले गेले असून अंतिम एकादशसाठी त्याचा विचार केला जाणार नाही, असा सूत्राचा दावा आहे.
भारतीय फलंदाजी लाईनअप पुजारा, गिल, विराट, श्रेयस, विहारी व रिषभ पंत अशी असेल, असे सध्याचे संकेत आहेत. शार्दुल ठाकुरच्या रुपाने चौथा जलद गोलंदाज खेळवणार की रविंद्र जडेजासह अश्विनच्या रुपाने दुसरा फिरकीपटू खेळवणार, हे उद्या नाणेफेकीवेळी स्पष्ट होणार आहे. सध्या जलद गोलंदाजी लाईनअपमध्ये कर्णधार बुमराहसह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी यांचे स्थान निश्चित असणार आहे.
उभय संघातील मालिकेतील 4 कसोटी सामन्यांचे निकाल
लढत / तारीख / निकाल / ठिकाण
पहिली कसोटी / 4 ते 8 ऑगस्ट 2021 / सामना अनिर्णीत / नॉटिंगहम
दुसरी कसोटी / 12 ते 16 ऑगस्ट 2021 /भारत 151 धावांनी विजयी / लॉर्ड्स
तिसरी कसोटी / 25 ते 28 ऑगस्ट / इंग्लंड 1 डाव व 76 धावांनी विजयी / लीड्स
चौथी कसोटी / 2 ते 6 सप्टेंबर / भारत 157 धावांनी विजयी / द ओव्हल