प्रतिवर्षी 26 जानेवारीला हिंदुस्थानात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतो. 1950 साली भारताची राज्यघटना 26 जानेवारीला स्वीकारण्यात आली. भारतीय संविधान सभेने स्वीकार केलेला हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1930 साली 26 जानेवारीला भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीवर राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी टाकण्यात आली. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता, लोकशाही म्हणून या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे. घटनेने प्रत्येक नागरिकाला अधिकार व कर्तव्ये सांगितली आहेत. नागरिकांचे हे मूलभूत अधिकार व कर्तव्ये महत्त्वाची आहेत. आपले संविधान जगातील सर्वात मोठे आहे आणि आपली लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. दीर्घकाळ दिलेला स्वातंत्र्यलढा आणि हजारो जणांचे बलिदान यातून मिळालेले स्वातंत्र्य व संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला, देशभक्ताला प्राणप्रिय आहे. लोकशाहीत देशाचा प्रमुख वारसा हक्काने वा घराणेशाहीने न निवडता लोकांच्या मतदानातून निवडला जातो. लोकनियुक्त प्रतिनिधी राज्य करतात, कायदे करतात व घटनेला अनुसरुन देश चालवतात. कोवीडच्या महामारीनंतर यंदा उत्साह, उमेद आणि सामर्थ्य यांचे दर्शन देत प्रजासत्ताक साजरा होणार आहे आणि त्यासाठी दिल्लीचा कर्तव्यपथ सुसज्ज झाला आहे. त्याचबरोबर दिल्लीपासून गल्लीपर्यंत उत्साहाचे वारे वाहते आहे. यंदा कर्तव्य पथावर भारतीय संरक्षण दलाच्या दमदार संचलनामध्ये अनेक तुकडय़ांचे नेतृत्व महिला अधिकारी करणार आहेत. स्त्राr सामर्थ्यांचे व स्वदेशी शक्तीचे अनोखे दर्शन पथसंचलनातून तेथे होईल. प्रजासत्ताक दिनाची ही परेड अनोखी, आगळीवेगळी, रंगारंग आणि मोठा संदेश देणारी असते. भारतीय सामर्थ्यांचे दर्शन म्हणून लेफ्टनंट चेतना शर्मा यांच्या नेतृत्वाखाली जमिनीवरुन हवेत मारा करणाऱया आकाश या क्षेपणास्त्राचे सादरीकरण होणार आहे. आकाश हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. यंदाही कर्तव्यपथावर बाईक स्वारांची थरारक प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. त्यामध्येही नारीशक्ती दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी द्रौपदी मुर्मू या महिला राष्ट्रपतींच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. हवाईदल, नौदल याचबरोबर वेगवेगळय़ा राज्याचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार आणि राष्ट्रपतींचे राष्ट्राला संबोधनही महत्त्वाचे असते. प्रजासत्ताकदिनी अनेक लोक दिल्लीला जातात. तेथे रंगारंग कार्यक्रम पाहतात. देशभक्तीने भारावून जातात. यंदा ‘मेड इन इंडिया’शस्त्रs, उपकरणे, लष्कारातील अग्निवीर तुकडीचे पथसंचलन आणि नारी शक्तीचे दर्शन अनोखे असेल. या दर्शनाने अनेकांना भारताची शक्ती, प्रगती, गती समजेल. यंदा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिझी हे प्रमुख पाहुणे आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा ड्रोन शो हे आगळेपण आहे. या सर्वातून भारताची शक्ती, प्रतिभा, संस्कृती, लोकशाही मूल्ये यांचे भारावून टाकणारे दर्शन होईल व देशातील सर्वांनी ते घेतले पाहिजे. समजले पाहिजे. पण अलीकडे 26 जानेवारी व जोडून सुट्टय़ा घेऊन पर्यटनाला बाहेर पडणारा मोठा वर्ग आहे. देशभर वेगवान वाहने आणि रस्ते यांचे जाळे झाले आहे. तरीही मुंबई, पुणे वगैरे मोठी महानगरे आणि गोवा, गणपतीपुळे, लोणावळा, महाबळेश्वर अशी पर्यटनस्थळे 26 जानेवारी दरम्यान अतिप्रचंड गजबजलेली असतात. वाहतूक कोंडी होत असते. व्यवस्था कोलमडतात. दुर्घटना घडतात. यासाठी संयम गरजेचा असतो आणि तो पाळणे महत्त्वाचे आहे. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने लोकांनी आपली कर्तव्ये समजून घेतली पाहिजेत. निदान सार्वजनिक स्वच्छता, व्यवस्था याचा आदर केला पाहिजे. आपआपल्या पातळीवर निसर्ग रक्षण आणि स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, कायदय़ाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोकांच्या पातळीवर 26 जानेवारीला आनंद, उत्साह आणि देशभक्तीची किनार असली तरी राजकीय पातळीवर यानिमित्ताने यंदा वेगळीच चर्चा आहे. 26 जानेवारीनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल बदलणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांची विधाने आणि भाषणे वादग्रस्त ठरली आहेत. दोन दिवसापूर्वी पंतप्रधानांच्या दौऱयात मुंबईत ते उपस्थित होते. पण केवळ खुर्चीवर बसले होते. त्यांची देहबोली बोलकी होती. ओघानेच नवे राज्यपाल कोण? हा सवाल राजकीय पातळीवर चर्चेला आहे. राजकीय पटलावर राज्यपाल बदलणार अशी चर्चा आहे. त्याच जोडीला केंद्राचा व राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित झाले आहे. 26 जानेवारीनंतर लगेचच हा विस्तार होईल आणि केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी दिल्लीतील चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात काहींना डच्चू मिळणार तर काही नव्यांना संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर केंद्रात होणाऱया मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या दोघा-तिघांना केंद्रात मंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक,मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक डोळय़ापुढे ठेऊन विस्तार केला जाईल आणि काहींना तर डच्चू देत नव्यांना संधी दिली जाईल. राजकीय समीकरणे रोज बदलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा व भाषण यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक दूर नाही हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळणार यावर अवलंबून आहे. प्रत्येकाला लाल दिव्याची गाडी हवी आहे. भाजपाकडूनही मंत्रीपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. राज्यात मोठा विस्तार होणार नाही. काहींना आणखी काहीकाळ झुलवत ठेवले जाईल. राजकारणाचे हे उणे-दुणे सुरुच राहणार. पण लोकांनी लोकांच्यासाठी स्थापन केलेले लोकांचे लोकशाही राज्य 74 वर्षाची पूर्ती करते आहे. अनेक पातळीवर उन्नती करते आहे. देशाचा तिरंगा उंचावतो आहे हे सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा…!
Previous Articleनर्मदा नदी…
Next Article देसूर येथील रेल्वेगेट उद्या बंद राहणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.