दिल्लीतील न्यायालयाचा निवाडा, आरोपींना दंडही ठोठावला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हिच्या हत्येप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने शनिवारी दोषींना शिक्षा जाहीर केली. चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय दंडही ठोठावण्यात आला. शुक्रवारी दोषींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला होता.
एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या विश्वनाथनची 30 सप्टेंबर 2008 रोजी सकाळी दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला रोडवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कामावरून घरी परतत असताना झालेल्या या हत्येच्या घटनेने देशभरात खळबळ निर्माण झाली होती. आता न्यायालयाने दोषी रवी कपूर, अमित शुक्ला, अजय कुमार आणि बलबीर मलिक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी, अजय सेठी याला कलम 411 आणि ‘मोका’ तरतुदींनुसार संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे, मदत करणे किंवा जाणूनबुजून मदत करणे आणि संघटित गुन्हेगारीचे पैसे मिळविण्यासाठी कट रचल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले.
दोषींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने 7 नोव्हेंबर रोजी खटला पुढे ढकलला. यापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना कलम 302 आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा तरतुदींनुसार (मोका) संघटित गुन्हेगारी केल्याबद्दल दोषी ठरवले होते.
फिर्यादीनुसार, रवी कपूरने 30 सप्टेंबर 2008 रोजी विश्वनाथनवर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेदरम्यान तो दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला रोडवर कारमधून लुटीच्या उद्देशाने पीडितेचा पाठलाग करत होता. कपूर याच्यासोबत शुक्ला, कुमार आणि मलिकही होते. पोलिसांनी सेठी उर्फ चाचा याच्याकडून खुनात वापरलेली कार जप्त केली आहे.