नगर, पुणे / प्रतिनिधी :
देशातील वारे आता वेगळ्या दिशेला वाहू लागले आहेत. कर्नाटकप्रमाणेच देशाचे चित्र बदलण्याची सध्या अनुकूल वातावरण असून त्याकरिता विरोधकांच्या एकजुटीची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले. हमाल मापाडी महामंडळाच्या नगरमध्ये आयोजित २१ व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते डॉ. बाबा आढाव होते.
पवार म्हणाले, कर्नाटकात काँगेसने एकतर्फी विजय मिळवित भाजपावर मात केली. वातावरण बदलत असल्याचे हे चिन्ह आहे. सध्या सर्वत्र हेच चित्र आहे. त्यामुळे विरोधकांना एक व्हावे लागेल. कर्नाटक पॅटर्नप्रमाणे देशाचे चित्र नक्कीच बदलू शकते. नगर हा पुरोगामी जिल्हा, परंतु या जिल्ह्यातील शेवगावसारख्या गावात जातीय संघर्ष निर्माण केला जात आहे. त्याविरुद्ध लढा दिला नाही, तर कष्टकऱ्यांची जीवन उद्ध्वस्त होईल. देशातील सत्ताधारी जाती-धर्माच्या आधारे संघर्ष निर्माण करत आहेत. त्यापासून सावध रहावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
पवार पुढे म्हणाले, हमाल मापडींना कायद्याचे संरक्षण आहे, या संरक्षणावर हल्ला करण्याचे काम काहीजण करत आहेत, त्यांना माथाडी कायदा खुपतो आहे. हा कायदा जुना झाले, असे ते सांगत आहेत. परंतु या कायद्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. फडणवीस सरकारने आता ३६ जिल्ह्यांसाठी एकच महामंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण तो माथाडी एकजुटीने हाणून पाडला. माथाडींवर गुंडगिरी व पैसे लुबाडण्याच्या प्रयत्नांचा आरोप करून चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्या विरोधात आवाज उठवतानाच एकजूट दाखवावी लागेल.
विखेंवर बावा आढाव यांची टीका
या वेळी बोलताना कामगार नेते बाबा आढाव यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. माथाडी कायद्याच्या नावाखाली गुंडगिरी कोण करत आहे? त्यांची नावे विखे यांनी जाहीर करावीत. या कायद्याच्या निधीची जबाबदारी कोणावर नाही, आमच्याच घामातून आम्हाला सुविधा दिल्या जात आहेत. तरीही कायद्याचे संरक्षण काढण्याची भाषा केली जात आहे. परंतु विखे यांच्या आजोबांच्या पुढाकारातून साखर कामगारांनी श्रीरामपूरमध्ये साखर कामगार रुग्णालय सुरू केले, महाराष्ट्राने देशाला माथाडी कायदा दिला, याची जाणीव विखे यांनी ठेवावी. याच कारणातून नगरला अधिवेशन घेण्यात आले, असे बाबा आढाव यांनी स्पष्ट केले.