हिंदु पंचांगातील शेवटचा महिना फाल्गुन शिशिराचा कहर अगदी शिगेला पोहचलेला. इकडे आमचा मार्च एंड. तिकडे प्रत्येक पानाचं ऑडीट करायला बसलेली पानगळ. शॉर्ट टर्मचे तात्पुरते फायदे मिळाले असले तरी लाँगटर्म इन्व्हेस्टमेंटचे आंब्याचे मोहोर झुलायला लागले की समजावं निसर्गाचे शेअर मार्केट वधारले आहे. हे सांगायला अनेक ठिकाणची चाफ्याची झाडं फांदी-फांदीला भरपूर फुलासहित बुके होऊन सजतात. दुसरीकडे सृष्टीला सुंदर स्वप्न पडावं तसं निळय़ा आभाळावर शेडिंग करावं तसंच एक पेंटीग तयार होत असतं ते म्हणजे निलमोहराचे झाड. सर्वांगाने फुलून येणारं पर्णहीन नीलकांती झाड म्हणजे नीलमोहोर. निळाईने सजून जणू आकाशाला विचारत असतो रंग तुझ्यासारखा आलाय ना? अगदी…
‘तुझेच रंग लेवूनी, तुझ्या पुढे खटय़ाळसा….
कृष्ण रूप जाहलो, रंगल्या दिशादिशा…..’
प्राणप्रिय राधेसाठी कृष्ण रूपातली पृथ्वीवरची अभिव्यक्ती म्हणजे नीलमोहोर या ऋतुतलं मोठं आकर्षण. त्याची दखल घेतल्याशिवाय आपलं पाऊल पुढे पडतच नाही. मोगरा…….इंद्रधनुचे सातही रंग आपल्या मुठीत घेऊन येणारं एकमेव फूल म्हणजे मोगरा. चैत्राचा सांगावा घेऊन आलेला चिमुकला देवदूतच. एका छोटय़ाशा फुलामुळे, त्याच्या सुगंधामुळे उन्हाची तगमग संपते आणि आम्ही पुढच्या क्षणाचे रंग, गंध शोधायला सज्ज होतो. वैराग्याची पांढरी वस्त्र लेवून वसंत वैभवाचे रंगोत्सव दाखवणारं फूल म्हणजे मोगरा याचं नेमकं वर्णन करताना कवि ग्रेस लिहितात…….
‘अलभ्य फुलला घन वसंत हा मोगरा…….
विनम्र लपवू कुठे ऋदय स्पंदनांचा झरा…….’
पळसाचं मात्र तसं नसतं, वर्षभर नुसताच पर्णभार सांभाळणारा, रूंद पानं लोकांच्या जेवणात पत्रावळीसाठी देताना आता जुनी, जीर्ण पानं टाकून कृतकृत्य झालेला असतो. सगळेच मुखवटे, चेहरे गळून पडल्यावर जो अलिप्तपणा येतो तो पळसालाही येतोच. त्याचं हे वैराग्य मात्र सगळय़ांच्या डोळय़ात त्याच्या लालभडक फुलामुळे खुपायला लागतं. क्रांतीच्या मशाली पेटवून एखादा कम्युनिस्ट उभा राहायलाय असेही वाटून जाते. आणि उन्हाची तलखी उगीचच जास्त झाली असे वाटते. अशा या उन्हात पक्षांसाठी पाण्याच्या सुराया फुलांमध्ये दडवून ठेवणारी पिचकारीची झाडही तयार असतात आणि हो, कावळय़ाच्या पिलांना कोकीळेचे तात्पुर्ते पाळणाघर काही काळापुरते मिळतेच. लाल भडक पळसाची, गुलमोहराची फुलं सडा टाकून मोठय़ा रांगोळय़ा काढण्यात मग्न असतात तर पिवळसर सोनेरी आणि बहावा आपलाही सडा पसरून चैत्राच्या हळदी कुंकवाची तयारी पूर्ण करतात. शिशिराचा कहर अन चैत्राचा बहर, या दोन्ही अवस्था पेलणारा ऋतू. सगळय़ा संवत्सराचे सार एकत्रीत करून जगण्याची आशा जागवतो तो हा फाल्गुन. एक पर्व संपण्याआधीच दुसऱयाला पायघडय़ा घालणारा बैरागी बसंत, प्रवृत्ती निवृत्तीच्या वाटेवर हे सगळे खेळ करत असतो. ते सगळेच समजायला प्रत्येक ऋतू अंतकरणात रूजायला हवा. धुळीच्या वावटळी इंद्रधनुष्य बनून आकाशात पोचायला हव्यात. पानगळीमुळे देठाला झालेलं दुःख कुरवाळत किंवा उगाळत बसायचं नाही कारण चैत्र आता अगदी उंबऱयात येऊन थांबलेला जाणवायला लागलेला असतो. चैत्र गौर येण्याआधीच या फाल्गुनात बोगनवेली जत्रेला निघाल्या सारख्या विविध रंगांनी नटून थटून सज्ज झालेल्या असतात. उघडय़ा बोडक्मया झाडांना उगीचच शेले पांघरल्याचा आनंद. मधुमालतीच्या वेली मात्र अगदी सोज्वळ, प्रसन्न-वदना बाईसारख्या मंद गंध पसरत पुढच्या कामाला लागलेल्या असतात. जीवनातली सगळीच उन्हं पांघरून आमचे सगळय़ांचे वसंत फुलवणारी माय माऊलीच तीच्या रूपात अवतरते. अशा या गौरीचे पाळणे सजवायला तत्परतेने उभ्या असलेल्या या सोशिक वेली म्हणजे चित्रमय चैत्र. या फुलां बरोबरच मंदधुंद सुगंधाची उधळण करत दवणा आणि मरवा लगबगीने निघालेले असतात. चाफा मोगरा, मधुमालती सगळेच जणु या मधुमासाला पायघडय़ा घालत अत्तरदाणी घेऊन सज्ज असतात. निसर्गातली चैत्र गौर मात्र या सोहळय़ासाठी केव्हाच तयार झालेली असते. ही गौर बघायला फणसाच्या छोटय़ा छोटय़ा कोयऱया (बाळफणस)तयार होवून झुलत असतात. तर आंब्याचे मोहोर बाळ कैऱयांच्या गाठीच्या माळा घेऊन मिरवत असतात. ज्या झाडांना मोहोर आधीच येतो त्या झाडाच्या कैरीला पन्हं आणि कैरीची डाळ करताना मानाचं स्थान मिळतं. बाकी हरभरे ओटी भरून घेतांना दुसऱया दिवशीचा उसळीचा किंवा चटपटीत चणे हा बेत ठरलेलाच असायचा. खरबूज, टरबूज, रसने आधी डोळय़ांची तहान भागवायचे. पन्हय़ाला अमृताचा स्वाद असायचा, अन कैरीची आंबट तुरट चव बालपणीच्या आठवणीत कायमची घर करून राहायलाच यायचे, ते यामुळेच. ऋतुसुद्धा मनात रूजवायला लागतात. तसं ज्याला जमतं त्यांच्या रितेपणाचे वसंत फुलून येतातच. म्हणूनच तर याला बैरागी वसंत म्हणतात. मोहमाया, अहंकार सगळंच पानझडी सारखं झडून नवीन अंकुरासाठी तो चैतन्यमय आत्मा तयार असतोच, त्यानुसार, अवस्था असणारा हा ऋतुपतीचा सोहळा ज्ञानदेव स्वधर्म आचरण्यासाठी मुद्दाम सांगतात. प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार कुवतीनुसार झडतात आणि बहरतात, तसेच सृष्टीत सुद्धा, हे सगळेच ऋतुपर्वानुसार सुरू असतेच. सृष्टीतील देखणेपण खुलायला वसंत मात्र यायलाच लागतो. एक मात्र निश्चित, त्यासाठी विसंगतीची सुसंगती धरायला लागते.