वृत्तसंस्था/ भोपाळ
आयएसएसएफच्या विश्वचषक पिस्तूल आणि रायफल नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सरबज्योत सिंगने पुरुषांच्या एअर पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक तर वरुण तोमरने या क्रीडा प्रकारात कास्यपदक मिळवले. मात्र या स्पर्धेत भारताच्या महिला नेमबाजांकडून पूर्ण निराशा झाली.
या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या मनू भाकर, दिव्या सुब्बाराजू आणि रिदम सांगवान यांनी सहभाग दर्शवला होता पण त्यांची महिलांच्या एअर पिस्तूल नेमबाजीत पहिल्याच दिवशी खराब कामगिरी झाली. 2021 च्या कनिष्ठांच्या विश्व चॅम्पियन भारतीय संघातील सदस्य सरबज्योत सिंगने बुधवारी पुरुषांच्या एअर पिस्तूल नेमबाजीत अंतिम फेरीत अझरबेजानच्या रुसलेन लुनेव्हचा 16-0 असा एकतर्फी पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. सरबज्योतने या क्रीडा प्रकारातील पात्र फेरीत अखेर 585 गुण घेत आघाडीचे स्थान मिळवले होते. तर चीनचा जीनयाओ 584 गुणासह दुसऱ्या स्थानावर होता. वरुण तोमरने 579 गुण नोंदवले होते.
महिलांच्या एअर पिस्तूल नेमबाजीत भारताची ऑलिम्पिक नेमबाज मनू भाकरच्या तुलनेत 27 वर्षीय दिव्या सुब्बाराजूची कामगिरी अधिक समाधानकारक झाल्याने तिने मानांकन फेरीत प्रवेश मिळवला. चीनच्या लि झुईने महिलांच्या एअर पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक मिळवताना जर्मनीच्या डोरेन व्हेनीकॅम्पचा पराभव केला. चीनच्या वेई क्युयानने या क्रीडा प्रकारात कास्यपदक घेतले. मनू भाकरने 568 तर रिदम सांगवानने 572 गुण नोंदवल्याने त्यांना मानांकन फेरी गाठता आली नाही. त्यामुळे त्यांना पात्रता फेरीतून बाहेर पडावे लागले.