बोरगावात पिकावर ट्रॅक्टर चालवण्याची ओढवली नामुष्की; बोरगावच्या हाताश शेतकऱ्यावर निसर्गाची अवकृपा
अमोल फुलारी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यात झालेल्या सततच्या पावसाने उडीद तूर मूग व सोयाबीन या सर्वाधिक लावगड क्षेत्र असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे खरीप पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. निराशा व संतापाच्या भरात एका शेतकऱ्याने शेतात उभ्या दोन एकर उडीद पिकावर ट्रॅक्टर फिरवून ते नष्ट केले.
चालू हंगामात अक्कलकोट तालुक्यात पावसाने थैमान घातले त्यामुळे शेतशिवारात अति पावसाने सगळीकडे पाणी साचले. आजही शेतात पाऊल ठेवता येत नाही अशी अवस्था आहे. आश्लेषा पावसाच्या कहराने उडीद पिकाच्या शेंगाच भरल्या नाहीत.त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे डोळ्यादेखत नुकसान झाले.त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे येथील निराश झालेल्या सतीश भीमशा गुरव या शेतकऱ्यांने दोन एकर उभ्या उडीद पिकावर ट्रॅक्टर फिरवून घामाने पिकवलेल्या पिकाला उध्वस्त केले.
पिकांचे प्रचंड नुकसान –
यंदा खरीप हंगामात सततच्या पावसाने तूर उडीद मूग सोयाबीन या सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या नगदी पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.बोरगाव येथील सतीश गुरव यांच्या शेतात दोन एकर उडीद पीक होते. पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवताना डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
बोरगाव भागात सर्वाधिक पाऊस
किणी मंडलात यंदा उच्यांकी पाऊस झाला. एका दिवसात बोरगाव मध्ये ५४ मिलिमीटर पाऊस पडला. एका क्षणात होत्याचे न्हवते झाले. अति पावसाने शेतजमिनी नापिक झाल्या आहेत.
ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने बोरगाव शिवारात मोठे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे सुद्धा केले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी शेतकरी मागणी करत आहेत.
खरीप हंगाम वाया गेला आता नशिबावर भार ठेवत रब्बी हंगामात तर निसर्ग तारेल ही आशा शेतकरी बाळगून आहे. नुकसानभरपाई लवकर मिळाल्यास रब्बीची तयारी तर करता येईल.
मनावर दगड ठेवला
दोन एकरात उडीद पेरले होते जमिनीची मशागत ते आजवर ३० हजार खर्च केले होते. पीक सुद्धा चांगले आले होते पण निसर्गाच्या कोपामुळे यंदा शेंगा भरल्याच नाहीत त्यामुळे मनावर दगड ठेवून उभ्या दोन एकर पिकात ट्रॅक्टर फिरवून पिकं उध्वस्त केलो.शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी आता रब्बीची तयारी करतो बघतो यातून तर फायदा होतो की नाही. – सतीश गुरव, शेतकरी बोरगाव दे.