किरकोळ प्रमाणात जनावरांना लागण, पशुपालकांसमोर चिंता
बेळगाव : लम्पीचा प्रादूर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. लम्पीची लागण झालेली जनावरे किरकोळ प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे पशुसंगोपन खात्याची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. शिवाय पशुपालकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. लम्पीचे समूळ उच्चाटन झाले नाही. अद्याप एक दोन प्रकरण समोर येत आहेत. त्यामुळे पशुपालकदेखील च्ंिातेत आहेत. लम्पी विषाणूजन्य रोगाने सप्टेंबरदरम्यान शिरकाव केला होता. त्यानंतर अधिक फैलाव झाल्याने जिल्ह्यातील 20हजारहून अधिक जनावरे दगावली होती. जानेवारीनंतर या रोगावर काहीसे नियंत्रण आले होते. त्यामुळे पशुसंगोपन खात्याने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र आता पुन्हा या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने भीती व्यक्त होऊ लागली आहे. लम्पीने दगावलेल्या जनावरांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात लम्पीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र उर्वरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. लम्पीने दगावलेल्या बैलांसाठी 30, गाईसाठी 20 आणि वासरासाठी 5 हजार रुपये मदत दिली जाते.
गोवर्गीय जनावरांचा अधिक मृत्यू
लम्पीने, गोवर्गीय जनावरांचा अधिक मृत्यू झाला आहे. यामध्ये विशेषत: गायीची संख्या अधिक आहे. त्यामुळे दूध उत्पादनावरदेखील याचा परिणाम झाला आहे. लम्पीने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लम्पी पूर्णपणे कमी झाला असे वाटत असतानाच पुन्हा या रोगाची जनावरे आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा चिंता वाढू लागली आहे.