पशुसंवर्धनच्या माध्यमातून 41 हजार जनावरांचे लसीकरण : मोहीम जलदगतीने राबविणार
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील अनेक भागात लम्पिस्कीनचा प्रादुर्भाव झाला होता. पशुसंवर्धन खात्याकडून गेल्या महिन्याभरात सातत्याने लसीकरण व जागरुकता करून लम्पिस्कीन रोग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आतापर्यंत तालुक्यातील 41 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून 502 जनावरे दगावली. 398 जनावरांना वाचविण्यात यश आले आहे. येत्या 15 दिवसात पुन्हा लसीकरण मोहीम जलदगतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन खात्याचे डॉ. अस्मित कोडगी यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
बेळगाव जिल्हय़ाच्या इतर भागांपेक्षा खानापूर तालुक्यात लम्पिस्कीनचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी जनावरांचा बाजारही बंद केला होता. बेळगाव परिसरातील काही नातेवाईकांनी शेतकऱयांकडे आपली लागण झालेली जनावरे पाठविल्याने खानापूर तालुक्यात लम्पिस्कीनचा प्रादुर्भाव उशिरा झालाच. लम्पिस्कीनची सुरुवात झाली तेव्हाच जनावरांच्या सुरक्षिततेसाठी 50 हजार लम्पिस्कीनविरोधी लसी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तालुक्यात तातडीने लसीकरण सुरू केले. त्यामुळे मोठा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले. जिल्हय़ातील इतर तालुक्यांपेक्षा खानापूर तालुक्यात लम्पिस्कीनचा प्रादुर्भाव कमी आहे.
तालुक्यात लसीकरण करण्यात यशस्वी
तालुक्यात एकूण 83 हजार जनावरे आहेत. त्यापैकी 42359 गो-वर्गीय आहेत. आतापर्यंत लम्पिस्कीनची लागण झालेल्या 398 गायींना वाचविण्यात आले असून त्यातील 69 जनावरे पूर्णपणे रोगमुक्त झाली आहेत. तालुक्यात 63 पशुवैद्यांची गरज असली तरी सध्या 29 पशुवैद्य कार्यरत आहेत. तालुका कार्यक्षेत्रात 256 खेडी असून ती अतिदुर्गम व जंगल भागात आहेत. मात्र, संपूर्ण तालुक्यात लसीकरण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. गर्लगुंजी, बिडी, पारिश्वाड आणि खानापूर शहर परिसरात या रोगाची जास्त लागण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय उपचार मिळाल्याने या ठिकाणीही लम्पिस्कीन आटोक्यात आहे.
पशुसंगोपन खात्याचे सहकार्य
राज्य सरकारने दगावलेल्या जनावरांच्या मालकांना बैलासाठी 30 हजार रु. व गायीसाठी 20 हजार रु. मदत जाहीर केली आहे. पशुसंगोपन खात्याच्यावतीने दगावलेल्या जनावरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल तसेच इतर माहिती तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासनाकडून शेतकऱयांच्या खात्यावर मदतनिधी जमा करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध करून देण्यास पशुसंगोपन खाते पूर्णपणे सहकार्य करीत आहे.
ऐन सुगीच्या हंगामातच लम्पिस्कीनचा फैलाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे सुगी, भात कापणी आणि जनावरांची देखभाल करणे यामध्ये शेतकऱयांचे हाल होत आहेत. दुभत्या आणि गाभण गायी दगावल्याने शेतकऱयांना आर्थिक फटका सोसावा लागला आहे.
खबरदारी घेण्याचे आवाहन
लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जनावरांचा बाजार, शर्यती व अंतर्गत खरेदी-विक्री व वाहतूक बंद केली आहे. मात्र, नातेवाईकांच्या तसदीमुळे बेळगाव तालुक्यातून काही जनावरे अद्यापही आणण्यात येत आहेत. हे तात्काळ बंद झाले पाहिजे. तसेच माशा, डास व गोचीड या कीटकांमार्फत हा रोग पसरतो. यासाठी गोठय़ात नियमित कीटकनाशक फवारणी व स्वच्छता राखणे तसेच बाधित जनावरे वेगळी करणे कटाक्षाने पाळावे. तातडीने पशुसंवर्धन खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कोडगी यांनी केले आहे.