धमकीला उत्तर म्हणून राजा धनुष्याला बाण लावून तो जिन्याच्या रस्त्याने जातो. गच्चीत पोहचल्यावर राजा भोवताली पाहतो. तेव्हा तिथे त्याला कुणीच दिसत नाही. पडद्यातून परत आवाज येतो. ‘मेलो, मेलो. मला तू दिसतोस, पण मी तुला दिसत नाही. त्यामुळे मी निराश झालोय!’ हे ऐकून राजा कोणत्यातरी पिशाचाला उद्देशून म्हणतो, ‘अरे, तिरस्करणी विद्येने शेफारलेल्या पिशाचा, आता माझे अस्त्र तुला शोधून काढेल. जसे हंस दुधातील पाणी टाकून दूध शोषून घेतो. ‘ तो अस्त्राचा वापर करतो, तेव्हा विदूषकाला सोडून मातलि…इंद्रसारथी …प्रवेश करतो. त्याला पाहून राजा चकित होतो आणि बाण मागे घेतो. विदूषकही तिथे येतो, तेव्हा आपल्याला जो बुकलून काढत होता, त्याचे राजा स्वागत करतोय हे पाहून तोही चकित होतो. मातलि राजाचा निरोप सांगतो की, ‘कालनेमी कुलोत्पन्न दुर्जय नावाचा राक्षससंघ आहे. त्याला इंद्रही जिंकू शकत नाही. ते काम फक्त तूच करू शकतोस. तेव्हा हाती शस्त्र घेतलेला तू तसाच इंद्ररथावर आरूढ होऊन, त्यांना मात देण्यासाठी आताच निघ.’ साक्षात महेंद्राने केलेला हा गौरव पाहून राजा फार भारावून जातो. त्याला उपकृत झाल्यासारखे वाटते. पण माढव्यावर कोणी चेटूक केले ते त्याला कळत नाही. तो मातलिला त्याबद्दल विचारतो.
मातलि सांगतो की, राजा काही कारणाने चित्तक्षोभ होऊन व्याकूळ झालेला दिसला. त्यामुळे राजाला क्रोध आणण्यासाठी त्याने माढव्यावर चेटूक केले. कारण अग्नी हलवला की, फुलतो, नागाला डिवचला की, तो फणा उभारतो, तसा स्वतःचे तेज दाखवण्यासाठी संताप आणण्याचीही गरज असते. हे सारे ऐकून राजा विदूषकाला सांगतो की, सुरेंद्राची आज्ञा मोडणे शक्मय नाही. तेव्हा हा सारा वृत्तान्त पिशुन अमात्यांना जाऊन सांग की, प्रजेच्या रक्षणासाठी तुमचे एकटय़ाचे बुद्धिसामर्थ्य पुरेसे आहे. जोपर्यंत हे सुसज्ज धनुष्य दुसऱया कोणत्यातरी महत्त्वाच्या कामात गुंतले आहे. विदूषक राजाज्ञा शिरसावंद्य मानून ते काम करायला जातो. मातलि राजाला इंद्ररथावर चढायला सांगतो. राजा रथात चढून त्याच्याबरोबर इंद्रलोकी दुर्जय राक्षसांचे पारिपत्य करण्यासाठी निघून जातो. इथेच सहावा अंक संपतो.
सातव्या अंकाच्या सुरूवातीला आकाशमार्गे रथात बसलेले राजा व मातलि मंचावर प्रवेश करतात. राजा मातलिला सांगतो की, देवेंद्राची आज्ञा सिद्धीस नेली असूनही त्याने केलेल्या अपूर्व सन्मानामुळे आपण काहीच केले नाही असे त्याला वाटतेय. मातलि स्मित करून ते दोघेही त्याला असंतुष्टच वाटताहेत असे सांगतो!