आपले भाग्य उजळले असे राजा मातलीला म्हणतो. त्यावर मातली म्हणतो, ‘कर्तुमकर्ता सत्ताधीशांची कृपा अशीच असते.’ राजा प्रजापतीला सांगतो की त्याने शकुंतलेशी गांधर्व विवाह करून तिचे पाणिग्रहण केले आहे. परंतु तिच्या नातलगांनी माझ्याकडे काही दिवसांनी आणल्यावर स्मृतीभ्रंशाने तिला ओळखलेच नाही. आपल्याच वंशातील कण्व ऋषींचा अपमान केला. पुढे मुद्रिका पाहिल्यावर त्यांच्या कन्येला मी वरले असल्याचे स्मरण झाले. मोठाच चमत्कार होता तो! ज्याप्रमाणे पुढय़ात हत्ती उभा असूनही तो दिसू नये. तो निघून गेल्यावर तो गेल्याचा भास व्हावा. तशीच माझी स्थिती झाली होती. तेव्हा मारीच त्यांचा उलगडा करतात की, शकुंतलेची स्थिती पाहून मेनका तिला अप्सरातीर्थावरून घेऊन दाक्षायणीकडे आली, त्याचवेळी दुर्वास ऋषींच्या शापामुळे तू शकुंतलेचा त्याग केलास. त्याची समाप्ती मुद्रिकादर्शनाने व्हायची होती. हे ऐकून राजा सुटकेचा निःश्वास टाकतो. शकुंतलेलाही साऱयाचा उलगडा होऊन राजाचा काही दोष नव्हता हे पटते. मारीच राजाला त्याच्या मुलाचे जातसंस्कार केल्याचे सांगतात. आपल्या पुत्राचे अभिनंदन करण्यास सांगतात. तसेच हा पुत्र पुढे चक्रवर्ती होणार असल्याचेही भाकित करतात. तो सर्व प्राण्यांना नमवतो, म्हणून त्यांचे नाव ‘सर्वदमन’ आहे, पुढे तिन्ही लोकांत गाजणार आहे, म्हणून याचे नाव ‘भरत’ ठेवण्यात आले आहे असे सांगतात. भगवान् मारिचांनी जातसंस्कार केलेत म्हणजे तसेच घडणार अशी राजाची खात्री होती. आदिती शकुंतलेबद्दलचे सर्व वृत्त कण्वमुनींना कळवायला सांगते. मेनकेला तर सारे कळलेलेच असते. मारीच गालव नावाच्या शिष्याला आकाशमार्गे जाऊन कण्वांना शकुंतलेची सुवार्ता कळवण्यासाठी पाठवतात. त्यांना निरोप देतात की, शापाचा परिहार झाल्यामुळे पूर्वस्मृती प्राप्त झालेल्या दुष्यंताने पुत्रवती शकुंतलेचा स्वीकार केला आहे. भगवंतांची आज्ञा घेऊन गालव कण्वांकडे निघतो.
नंतर राजाला उद्देशून मारीच म्हणतात की, ‘वत्सा तूही आता तुझा मित्र महेंद्राच्या रथात बसून तुझी पत्नी आणि मुलगा भरतासह आपल्या राजधानीला प्रयाण करावेस! त्याचबरोबर त्याला आशीर्वाद देतात की, तुझ्या राज्यात इंद्राने पुरेशी वृष्टी करावी, तूही भरपूर यज्ञ करून त्याला संतुष्ट करावेस. दीर्घकाळ असेच एकमेकांना सहाय्य करून दोन्ही लोकांना सुखी ठेवावे! राजा यथाशक्ती सारे करण्याचे आश्वासन देतो. आणखी काय हवे? असे मारीचांनी विचारल्यावर यापेक्षा अधिक काय मागणार? असे म्हणून राजा नाटकाचे भरतवाक्मय म्हणतो…