यावर्षीच्या गणेशोत्सवावर वाढत्या महागाईचे सावट असले, तरी कोरोनाचे सावट दूर झाले असल्याने मागील दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर निर्बंधमुक्त वातावरणात यावर्षीचा गणेशोत्सव होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षीचा महागणेशोत्सव म्हणून सर्वांसाठी खास ठरला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्हय़ात आठ लाखाहून अधिक चाकरमानी या महागणेशोत्सवासाठी दाखल झाले आहेत.
31 ऑगस्टपासून कोकणातील महाउत्सव समजल्या जाणाऱया गौरी-गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. अतिशय भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढालही मोठी असते. उत्सवकाळ हा अतिशय मंगलमय, प्रसन्नतेचा आणि आत्मिक समाधान देणारा असतो.
श्रावण महिना सुरू होताच अनेक सणांची लगबग सुरू होते आणि त्यासोबतच घरातल्या सर्व लोकांची आणि अप्रत्यक्षरित्या उद्योग व्यवसायाची देखील लगबग सुरु होते. गेली दोन वर्षे हे आर्थिक चक्र कुठेतरी विस्कळीत झाले होते. पण यावर्षी ते दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. गणरायाच्या आगमनावेळीही मोठय़ा जल्लोषात ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात आणि उत्सव साजरा केला जातो. नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, पोळा, गणपती आणि इतर सर्व उत्सवात खरेदी-विक्रीमुळे आर्थिक चक्र सुरू राहते आणि पैसा बाजारात फिरत राहतो. इतर वेळेस लोक मोठय़ा प्रमाणात खरेदी करीत नाहीत. परंतु, उत्सवाच्या दरम्यान आपोआपच खरेदी करण्याची क्षमता वाढते आणि उत्सवाचे आर्थिक चक्र वेगाने फिरते. त्यात कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच फायदा होतो. त्यामुळे गणेशोत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात.
कोकणातील लोक हे सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा पारंपरिक पद्धतीने घरगुती गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करतात. त्यामुळे कोकणात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना रुजली नाही. सिंधुदुर्गात केवळ 32 सार्वजनिक गणपती विराजमान केले जातात आणि 68 हजार 952 घरगुती गणपती विराजमान होतात. तर रत्नागिरी जिल्हय़ात सार्वजनिक 114 गणपती विराजमान केले जातात व 1 लाख 66 हजार 140 घरगुती गणपती विराजमान होतात. त्यामुळे सार्वजनिक गणपतींपेक्षा घरगुती गणपती मोठय़ा प्रमाणात विराजमान केले जातात. घरोघरी उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण असते. म्हणूनच जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी घरी परतलेला दिसतो.
पारंपरिक पद्धतीने कोकणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने मुंबईसह विविध शहरात राहणारे लोक, देश-विदेशात राहणारे चाकरमानी आवर्जून गणेशोत्सवाला आपल्या घरी येत असतात. मागील दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे अनेकांना गणेशोत्सवाला गावी येता आले नाही. तसेच निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करता आला नाही. कोरोना काळात गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागत होते किंवा 72 तास अगोदर टेस्ट रिपोर्ट करून येण्याचे बंधन घालण्यात आले होते. त्यामुळे गणेशोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. किंबहुना लोक एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुद्धा टाळत होते. आता मात्र परिस्थिती बदलली असून कोरोनामुक्त वातावरणामुळे गणेशभक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
कोकणात येणाऱया चाकरमान्यांनी सहा महिने अगोदरच रेल्वे, बसेसचे बुकिंग केले होते. त्याशिवाय चाकरमान्यांसाठी स्पेशल मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. कोकणरेल्वेच्या गणेशोत्सव हॉलिडे स्पेशल म्हणून जादा रेल्वे सोडण्यात आल्या. तसेच एसटी गाडय़ा, खासगी बसेस मोठय़ा प्रमाणात सोडण्यात आल्या. त्यामुळे कोकणात सुमारे आठ लाखावर चाकरमानी दाखल झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
महामार्गावरून खासगी वाहने घेऊन येणाऱया कोकणवासियांसाठी राज्य सरकारने टोलमाफीही केली आहे. काम सुरू असलेला कशेडी घाटही खुला केला आहे. तर महामार्गावरील खड्डे बुजवावेत, काम गतीने व्हावे व गणेशभक्तांना निर्धोकपणे प्रवास करता यावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खास कोकण दौराही केला. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. घाटमार्ग दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवावर महागाईचे मात्र सावट आहे. गणेशमूर्तीच्या किमती वाढलेल्या आहेतच, त्याचबरोबर सर्व कडधान्य, तेल, सजावटीचे साहित्य, कलर, भाज्या, फळे सर्वांच्याच किमती गगनाला भिडल्या आहेत.
कोरोनाच्या निर्बंधामुळे मागील दोन वर्षांत आरत्या, भजने, फुगडय़ांवर बंधने आली होती. यावर्षी मात्र सर्व धार्मिक कार्यक्रम होत आहेत. हे सर्व कार्यक्रम होत असताना अतिउत्साहात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी मात्र सर्वत्र बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक रेल्वे, बसस्थानके, महामार्ग आणि घाटमार्गावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आरोग्य पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
कोरोनाच्या निर्बंधामुळे निवडणूक पूर्व तयारीच्या निमित्ताने राजकीय पुढाऱयांना गणेश दर्शनासाठी फिरता येत नव्हते. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त उत्साही वातावरण असल्याने राजकीय नेते गणेश दर्शनासाठी फिरताना दिसणार आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे गणेश दर्शनाच्या निमित्ताने प्रचाराची संधी घेतली जाणार आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांची मोठमोठी होर्डिंगही लागलेली दिसत आहेत. एकूणच दोन वर्षांतील कोरोनाचे महासंकट दूर झाल्यानंतर प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव होत असल्याने महागाईची झळ पोहोचली असली तरी यावर्षी गणशोत्सव नव्हे, तर महागणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसतो आहे,हे मात्र नक्की.
संदीप गावडे