वृत्तसंस्था/ डालियान (चीन)
आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या (एएफसी) 23 वर्षांखालील आशियाई चषक पात्रता स्पर्धेच्या ‘गट जी’मधील भारताचा पहिला सामना बुधवारी खेळला जाणार होता. पण मालदीवने शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे हा सामना रद्द झाला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कळविल्यानुसार, हा गट आता तीन संघांचा बनला असून त्यात भारत, संयुक्त अरब अमिरात आणि यजमान चीन यांचा समावेश आहे.
भारत आता 9 सप्टेंबर रोजी दालियान सुओयुवान स्टेडियमवर संध्याकाळी 5.05 वा. चीनविऊद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळेल. मुख्य प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी वेळापत्रकात बदल झालेला असला, तरी संघाचे लक्ष विचलित झालेले नाही, अच्से सांगितले. ‘आमच्यासाठी काहीही बदललेले नाही. आम्हाला तसाच खेळ करायचा आहे जसा आम्ही मालदीवविरुद्ध केला असता. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे आणि आमच्या जास्तीत जास्त क्षमतेनुसार खेळायचे आहे’, असे मिरांडा यांनी सांगितले.
त्याचबरोबर प्रशिक्षक मिरांडा यांना चीनमध्ये दोन दिवस अतिरिक्त सराव करण्याची संधी मिळाल्याने आनंद झाला आहे. परंतु आधी एकही सामना न खेळता थेट यजमानांचा सामना करण्यातील प्रतिकूलताही त्यांना माहीत आहे. चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण संघ या नात्याने काही दिवस सराव करण्याची संधी मिळाली आहे. तसेच चीनच्या अत्यंत लांब आणि थकवणाऱ्या प्रवासानंतर खेळाडूंना यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विश्रांती मिळाली आहे तसेच त्यातून सावरण्यासाठी वेळ मिळाला आहे, असे ते म्हणाले.
मात्र मालदीवविऊद्ध खेळल्यामुळे आम्हाला चीन आणि संयुक्त अरब अमिरातीचा सामना करण्यापूर्वी लय शोधण्याची चांगली संधी मिळाली असती. तिघांपैकी मालदीव हा सर्वांत कमी धोकादायक प्रतिस्पर्धी होता आणि इतर दोन संघांविरुद्धच्या सामन्यांच्या तयारीच्या दृष्टीने ही संघासाठी एक चांगली सुऊवात ठरली असती, असे मिरांडा म्हणाले. एएफसी 23 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धा पुढील वर्षी 15 एप्रिल ते 3 मे या कालावधीत कतारमध्ये होणार आहे.