वार्ताहर,कार्वे
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे आज महारास्ता आंदोलन करण्यात आला.यावेळी प्रचंड संख्येने मराठा समाज उपस्थित होता. बेळगाव-वेंगुर्ला या प्रमुख राज्य मार्गावर हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनातील प्रवासी सुद्धा वाहनातून खाली उतरून या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी 16 टक्के सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.उपस्थिततांचे स्वागत व प्रास्ताविक मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरेश सातवणेकर यांनी करून या रास्ता रोको आंदोलनाचा हेतू स्पष्ट केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय आर्थिक दुर्बल घटकांची प्रगती साधता येणार नाही, त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील केले.
महाराष्ट्रात 32 टक्के मराठा समाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सर्वाधिक लोकसंख्या मराठ्यांची आहे. मराठ्यांच्या पोरांना नोकरी नाही म्हणून लग्न ठरत नाहीत.या समाजाचा उद्रेक होण्याअगोदर शासनाने गंभीर व्हावे असा इशारा प्रा.दीपक पाटील यांनी दिला.
निवडून गेलेल्या सर्व मराठा लोक प्रतिनिधीनी सावध रहावे,आरक्षणासाठी तुमचे योगदान द्या, नाहीतर हा उपेक्षित समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते नितीन पाटील यांनी दिला. चंदगडकर वेळानं करतील पण अगदी करेक्ट कार्यक्रम करतात हा इतिहास असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी व्यक्त केले.
आरक्षणामुळे मराठा समाज्याच्याशिक्षित तरुणांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.ही फक्त सुरुवात आहे हे शासनाने लक्षात घ्यावे.तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावे,असे मत संग्रामसिंह कुपेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ऐश्वर्या पाटील,पिनू पाटील,गणेश फाटक,विष्णू गावडे,गजानन कदम,शंकर मनवाडकर,पांडूरंग बेनके प्रा. घोळसे यांनी आपले विचार मांडले.आंदोलनात सकल मराठा समाज्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात महाविद्यालयीन युवतींचा प्रामुख्याने सहभाग ठळक दिसत होता. चदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.