कोनवाळ गल्लीतील पाणी समस्या निकालात काढण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : कोनवाळ गल्लीतील पाणी समस्येबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. जलवाहिन्या घालून दोन महिने झाले तरी अद्याप नळजोडणी केली नाही. त्यामुळे पाणी समस्या जैसे थे असल्यामुळे कोनवाळ गल्लीतील नागरिकांनी जनावरांसह महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येत्या आठ दिवसांत समस्यांचे निवारण करा, अन्यथा रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला. कोनवाळ गल्ली परिसरात उच्चदाबाने पाणीपुरवठा होत नाही. तसेच काही नळांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने याबाबत तक्रार करण्यात आली होती. पाणी समस्येबाबत 2014 पासून तक्रारी करण्यात येत असून अद्यापही समस्येचे निवारण झाले नाही. यापूर्वी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर जलवाहिनी बदलण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. पण दोन महिन्यांपासून हे काम अर्धवट राहिले आहे. अद्यापही नळजोडणी देण्यात आली नाही. तसेच खोदाई केलेल्या रस्त्याची दुऊस्ती करण्यात आली नाही. पाणी समस्येसह येथील सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट असून डेनेज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण केले नसल्याने कोनवाळ गल्लीतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसह समस्यांच्या निवारणासाठी कोनवाळ गल्ली परिसरातील रहिवाशांनी सोमवारी जनावरांसह कोनवाळ गल्लीतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच यावेळी महापालिकेच्या साहाय्यक कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन धारेवर धरले. पाणी समस्या निवारणासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची खोदाई करून जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले होते. जलवाहिन्या घालून दोन महिने उलटले, पण अद्यापही नळजोडण्या दिल्या नाहीत. नळ जोडण्या कधी देणार व पाणीपुरवठा कधी करणार? असा मुद्दा उपस्थित केला. रस्त्याची खोदाई केल्याने वाहने व रहिवाशांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. तसेच सर्व्हिस रस्त्यावरील डेनेज काम अर्धवट असून रस्त्यावरून नागरिकांना अडचणीचे बनले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली. येत्या आठ दिवसांत समस्यांचे निवारण करा, अन्यथा रास्तारोको करू, असा इशारा देण्यात आला.
पंधरा दिवसांचा अवधी देण्याची विनंती
एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून विचारणा केली असता, 5 मार्चपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. जलवाहिन्या घालून दोन महिने झाले, पण काम का पूर्ण केले नाही? अशी विचारणा केली असता थातूरमातूर उत्तरे दिल्याने नागरिकांनी पाणी समस्येबाबत धारेवर धरले. आठ दिवसांत काम पूर्ण करून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. पण एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांचा अवधी देण्याची विनंती केली. पंधरा दिवसांत नळजोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येईल, असे सांगितले. तसेच डेनेज वाहिन्यांचे आणि रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे मनपाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांनी सांगितले. य् ाावेळी सिंहगर्जना युवक मंडळ, महिला मंडळ आणि कोनवाळ गल्ली नागरिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी कोनवाळ गल्ली परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, विनायक बेळगावकर, अभिजित सुणगार, गुऊ चांदेकर, अशोक बेळगावकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.