मुलीने उचलले कौतुकास्पद पाऊल
आयसीयूत जेव्हा एखादा रुग्ण असतो, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असते. परंतु एकेठिकाणी आयसीयूमध्ये जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण पार पडला आहे. परंतु या क्षणावेळी सर्वांचे डोळे पाणावलेले होते. बिहारच्या गया येथील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये विवाह करविण्यात आला असून याची मोठय़ा प्रमाणावर चर्चा होत आहे. विवाहानंतर आनंद व्यक्त होत असतो, परंतु कुटुंबांसोबत रुग्णालयाच्या कर्मचाऱयांचेही डोळे पाणावलेले होते.
मी जिवंत असेपर्यंत व्हावा विवाह..
हा विवाह गयातील अर्श हॉस्पिटलमध्ये पार पडला आहे. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये पुनम कुमारी वर्मा नावाची महिला दाखल होती. तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पूनम यांनी मुलगी चांदनी कुमारीचा विवाह आपण जिवंत असेपर्यंत व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. पूनम यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी त्या वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगितले होते.
चांदनी कुमारीचा साखरपुडा 26 डिसेंबर रोजी सलेमपूर गावातील सुमित गौरवसोबत होणार होता, सुमित हा पेशाने इंजिनियर आहे. चांदनीच्या आईची इच्छा पाहता दोघांचा विवाह साखरपुडय़ाच्या निर्धारित दिवसाच्या एक दिवसच पार पडला आहे. दुःखाची बाब म्हणजे विवाहाच्या केवळ दोन तासांनीच पूनम कुमारी यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंतिम इच्छा पूर्ण
आपल्या मुलीचा विवाह व्हावा अशी पूनम वर्मा यांची अंतिम इच्छा होती. त्यांना स्वतःच्या डोळय़ांसमोर विवाह व्हावा अशी त्यांची इच्छा होती. माझ्या मुलीचा विवाह करा असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. मुलीला विवाहित पाहूनच अखेरचा श्वास घेऊ इच्छिते असे त्यांनी म्हटले होते. 26 डिसेंबरपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने रविवारी त्यांच्या मुलीचा विवाह करविणे भाग पडले. विवाहानंतर केवळ 2 तासांनी स्वतःच्या आईला गमाविलेल्या चांदनी कुमारीने तिची अखेरची इच्छा पूर्ण करता आली याचे समाधान असल्याचे म्हटले आहे.