मटका, जुगारावर आजपासून कडक कारवाई : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही,’हॅलो गोंयकारा’तून साधला गोमंतकीयांशी संवाद
पणजी : राज्यात खुलेआम चालणाऱ्या मटका आणि अन्य जुगारांवर आज शनिवापासून गृहखात्याकडून कारवाईस प्रारंभ करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. पणजी दूरदर्शनवरील ’हॅलो गोंयकारा’ या फोन-इन कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी काल शुक्रवारी संध्याकाळी सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक समस्या सोडविण्याचे तसेच विविध प्रकारच्या प्रक्रिया सुटसुटीत करण्याची आश्वासने दिली. तासभर चाललेल्या या कार्यक्रमात पेडणेपासून काणकोणपर्यंतच्या 35 नागरिकांनी प्रश्न विचारले. त्यातील बहुतेक प्रश्न रोजगार-नोकऱ्यासंबंधी होते. काही आरोग्यविषयक तर काही जल, पर्यावरण, कृषी, वाहतूक व्यवस्था, स्मशानभूमी, रस्ते आणि अन्य साधनसुविधा, यासारख्या विषयांवर आधारित होते. प्रीतम हरमलकर या ग्रामस्थाने फोंडा येथे खुलेआम जुगार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. फोंडा हे शहर मंदिराचे शहर म्हणून ओळखण्यात येते. परंतु या शहरात भर रस्त्याच्या बाजूलाच ’मटका’ सारखे जुगार खुलेआम सुरू आहेत. त्याशिवाय मिनी कॅसिनोही चालत असल्याचे हल्लीच टाकण्यात आलेल्या छाप्यातून स्पष्ट झाले होते, असे हरमलकर यांनी सांगितले. त्यावर बोलताना डॉ. सावंत यांनी, असे जुगार केवळ फोंड्यातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी चालत आहेत. त्यांच्यावर आजपासून पोलिसांकडून कारवाईस प्रारंभ करण्यात येईल, तशा सूचना आपण गृहखात्याला देईन, असेही त्यांनी पुढे सांगितले.
भंगार वाहनांची विल्हेवाट प्रक्रिया मार्गी
सरकारच्या विविध खात्यांकडे पडून असलेल्या भंगार वाहनांची वेळीच विल्हेवाट का लावली जात नाही? असा प्रश्न दत्ताराम चिमुलकर या ग्रामस्थाने विचारला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ’राज्याचे भंगार वाहन विल्हेवाट धोरण’ यापूर्वीच कार्यवाहित आले असल्याचे सांगितले. त्यानुसार निविदा जारी करून तीन कंपन्यांना कंत्राटही देण्यात आले असून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत सरकारी मालकीच्या सर्व भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्यात येईल, अशी माहिती दिली.
स्मशानभूमी प्रश्न तत्काळ सोडविणार
धारगळ येथील सम्राट सोयरोजी आणि भाटी सांगे येथील केतन देसाई या ग्रामस्थांनी आपापल्या भागातील स्मशानभूमीसंबंधी प्रश्न मांडले. गावचा अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न असतानाही वर्षांनुवेर्षे रखडत ठेवण्यात येतो. कोणतीही संबंधित यंत्रणा किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असे विषय गांभीर्याने हाताळत नाहीत. असे विषय थेट ग्रामसभेत मांडण्यात आले तरीही ठरावावर निर्णय होत नाहीत, अशा तक्रारी त्यांनी मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
बंधारे प्रकल्पांना विरोध करु नये
राज्यात गत काही वर्षांपासून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी त्यांच्या सेवेसाठी हॉटेल्स आणि अन्य प्रकल्पांची संख्याही वाढत आहे. अशावेळी राज्याची पाण्याची मागणी दरवर्षी वाढतच आहे. या अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधून सरकार तशी सोय करण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु अनेक गावात या बंधाऱ्यांना विरोध होत आहे. लोकांनी अशा प्रकल्पांना विरोध करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
लाभार्थींना माराव्या लागणार नाहीत खेपा
सरकारच्या विविध सेवांचा लाभ मिळविणाऱ्या लाभार्थीना अनेकदा विविध कारणांमुळे खात्यात खेपा माराव्या लागतात. त्यावर मार्ग काढण्यासंबंधी केपे येथील प्रेमानंद गावकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना डॉ. सावंत यांनी, ’सरकारच्या विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना यापुढे एखादा दाखला, प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधी वैयक्तिकरित्या फोन करून कळविण्यात येईल. त्यामुळे त्यांना खात्यात खेपा माराव्या लागणार नाहीत. त्यातून त्यांची वेळ व पैसा वाचेल, तसेच खात्यात होणारी लोकांची गर्दीही कमी होईल आणि कर्मचाऱ्यांना सर्व व्यवहार जलदगतीने पूर्ण करणे शक्य होईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोमेकॉत नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन
गोमेकॉत येणाऱ्या ऊग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या गंभीर स्थितीतसुद्धा नोंदणीसाठी रांगेत बराचवेळ थांबावे लागते. आज संगणक युगात जेथे सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात, तेथे हीच प्रक्रिया आजही जुन्या पारंपरिक पद्धतीने का? असा सवाल श्रीराम पोळे यांनी विचारला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम त्यांच्या सूचनेचे स्वागत केले. त्यात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यापुढे गोमेकॉतील सर्व नोंदणी प्रक्रिया डिजिटलाईज तथा ऑनलाईन पद्धतीने तर करण्यात येतीलच त्याही पुढे जाताना अशाच पद्धतीने आरोग्यविषयक सल्लाही देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लोकांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या
’हॅलो गोंयकारा’ हा फोन-इन कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आयोजित करण्यात येतो. त्यात आतापर्यंत सर्व विषयांचे प्रश्न हाताळण्यात आले आहेत. यापुढील भागात एका वेळी निवडक एकाच विषयावरील प्रश्नच घेण्यात यावेत, त्यायोगे त्यांची उत्तरे देणे सोपे होईल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम आयोजकांना केली. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणास आजपर्यंत अनभिज्ञ असलेले अनेक प्रश्न, समस्या, मागण्या यांची माहिती मिळाली. लोकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या, असे डॉ. सावंत यांनी शेवटी नमूद केले.